पावसाळा हा केवळ एक ऋतू नाही; तो गावाकडच्या माणसाच्या आयुष्याचा श्वास आहे. शहरात पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, चिखल आणि छत्र्यांची गर्दी. पण गावात पाऊस म्हणजे नवजीवन, नव्या आशा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जुळून आलेलं नातं. प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पावसाबद्दल एक वेगळी ओढ असते. माझ्याही मनात गावाकडच्या पावसाच्या असंख्य आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.
पावसाळ्याची चाहूल लागते ती वैशाख- ज्येष्ठाच्या कडक उन्हानंतर. धरती तापलेली असते, झाडांची पानं करपलेली असतात आणि माणसाबरोबरच पक्षी, प्राणीही पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मग एक दिवस अचानक आकाशात काळेभोर ढग जमू लागतात. दूरवर विजा चमकतात, गडगडाट होतो आणि थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगावर येते. त्या वाऱ्याबरोबर मातीचा सुगंध दरवळू लागतो. तो सुगंध इतका मोहक असतो की मन नकळत शेताकडे धाव घेतं.
पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर बरसू लागल्या की संपूर्ण परिसर जणू नव्याने जन्म घेतो. कोरडी पडलेली जमीन हिरवीगार होऊ लागते. डोंगरांवर हिरव्या गवताची चादर पसरते. झाडांच्या फांद्यांवर नवी पालवी फुटते. शिवारात सर्वत्र चैतन्य निर्माण होतं. शेतात उभं राहून पावसाच्या त्या थंडगार सरी अंगावर झेलण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. कधी-कधी वाटायचं, या ओल्या मातीवर शांतपणे पडून राहावं, डोळे मिटावेत आणि निसर्गाचं संगीत ऐकत राहावं.
त्या शांततेत दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानावर पडायचा. झाडांवर बसलेले पक्षी आनंदाने किलबिल करायचे. शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ नाद घुमायचा. पेरणीसुरू झालेली असायची. शेतकरी पावसात भिजत आपल्या कामात मग्न असायचे. कुणी नांगर चालवत असे, कुणी वखर फिरवत असे, तर कुणी बियाण्याची तयारी करत असे. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत समाधान आणि आशा दिसायची. कारण हा पाऊसच त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो.
पाऊस थोडा थांबला की आमच्या मुलांच्या खेळांना सुरुवात व्हायची. आम्ही मित्रमंडळी गावाबाहेरच्या डोंगराकडे धावत सुटायचो. कोणत्या डोंगरावरून किती पाणी वाहत आहे, कोणत्या नाल्याला किती पाणी आलं आहे, कोणता ओढा भरून वाहतो आहे, हे पाहण्यातच आमचा आनंद असायचा. छोट्या-छोट्या धबधब्यांखाली उभं राहून भिजणं, पाण्यात उड्या मारणं, चिखलात खेळणं हे आमच्यासाठी मोठं साहस असायचं.
हे सगळं पाहून आम्ही आनंदाने गावात परतायचो आणि प्रत्येकाला सांगायचो, "अरे, अमक्या नाल्याला भरपूर पाणी आलंय!", "डोंगरावरून मोठा धबधबा वाहतोय!" आमच्या त्या बातम्या ऐकून गावातील मोठी माणसंही आनंदी व्हायची. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता; पण प्रत्येक आनंद प्रत्यक्ष भेटून वाटला जायचा.
गावाकडच्या पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाचा अंदाज. आज हवामान खात्याचे अहवाल, मोबाईल अॅप्स आणि उपग्रह आहेत. पण पूर्वी गावातील अनुभवी ज्येष्ठ माणसं निसर्गाची भाषा ओळखायची. संध्याकाळी गावातील मंदिराच्या ओट्यावर काही वयोवृद्ध मंडळी बसायची. त्यांची नजर सतत आकाशात फिरत असायची. ढगांचा रंग, त्यांची दिशा, वाऱ्याचा वेग, पक्ष्यांची हालचाल, वातावरणातील बदल या सगळ्यांचा अभ्यास करून ते सांगायचे, "आज रात्री पाऊस येईल", "हा ढग पुढे जाईल", "यंदा पाऊस चांगला पडेल" किंवा "अजून दोन दिवस थांबावं लागेल."
त्यांच्या अंदाजाचं आश्चर्य वाटायचं. अनेकदा त्यांचा अंदाज अक्षरशः खरा ठरायचा. मीही त्यांच्या जवळ जाऊन बसायचो. एकदा मी त्यांना विचारलं, "तुम्हाला एवढं सगळं कसं कळतं?" ते हसले आणि म्हणाले, "हे पुस्तकात शिकायचं नसतं रे. वर्षानुवर्षे निसर्ग पाहिला की तो स्वतः शिकवतो." मग त्यांनी रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र, वाऱ्याच्या दिशा आणि ढगांच्या हालचालींबद्दल सांगायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांचं बोलणं मला फारसं समजलं नाही; पण आज कळतं की तो त्यांच्या अनुभवाचा आणि निसर्ग निरीक्षणाचा खजिना होता.
पाऊस पडल्यावर लगेच शेतात पेरणी केली जात नसे. दोन-तीन दिवस जमिनीला पाणी मुरू दिलं जायचं. मग उन्हाची एक हलकी झाक पडली की जमिनीतून वाफ यायला लागायची. शेतकरी म्हणायचे, "आता वाफ आली." हाच पेरणीसाठी योग्य काळ असायचा. मग संपूर्ण गावात लगबग सुरू व्हायची. कुणी बैल सजवत असे, कुणी बियाण्याची पोती तयार करत असे, तर कुणी शेतीची अवजारे तपासत असे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण शेतात काम करत असे. त्या दिवसांत गावातील प्रत्येक घर शेतीभोवतीच फिरत असे. पावसाळ्यात गावातील प्रत्येक सण, प्रत्येक आनंद अधिक खुलून दिसायचा. पावसात भिजून अंग थरथरत असताना आईच्या हातचा गरम चहा म्हणजे जणू स्वर्गीय आनंद वाटायचा.
आज काळ बदलला आहे. शेतीची साधनं बदलली, हवामानाचा अंदाज मोबाईलवर मिळतो, बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले, गावातही आधुनिकता पोहोचली. पण गावाकडच्या पावसाचं सौंदर्य मात्र अजूनही तसंच आहे. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध, हिरवागार शिवार, धुक्याने झाकलेले डोंगर, पाण्याने भरलेले ओढे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचं ते निरागस रूप हे कधीच बदलणार नाही.
आज शहरात राहत असलो तरी पावसाचा पहिला थेंब पडला की मन नकळत गावाकडे धाव घेतं. डोळ्यांसमोर पुन्हा तेच हिरवे डोंगर उभे राहतात, बैलांच्या घुंगरांचा नाद ऐकू येतो, कोकिळेचा आवाज कानात घुमतो आणि ओल्या मातीचा सुगंध मन भरून टाकतो. तेव्हा जाणवतं की गावाकडचा पाऊस हा फक्त पाऊस नसतो; तो आपल्या बालपणाच्या आठवणींचा, मातीतल्या नात्याचा आणि आयुष्यभर जपून ठेवावासा वाटणाऱ्या भावविश्वाचा अमूल्य ठेवा असतो.