Vilas Khairnar
Writer, Journalist
रविवार, २६ एप्रिल, २०२६
बुधवार, १८ मार्च, २०२६
भक्तीचा डंका
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
यमुना
सोमवार, ५ जानेवारी, २०२६
आजचा मिडिया
रविवार, २१ डिसेंबर, २०२५
बस स्टँडवर उभा असलेला काळ
- विलास खैरनार
मी आज साक्री बस स्टँडवर शांत उभा होतो. डोळे रस्त्याकडे लागलेले, कानात वाहनांचा आवाज, हातात मोबाईल, आणि मनात एकच विचार,बस केव्हा येईल? घड्याळाकडे वारंवार पाहण्याची सवय लागली आहे. वेळेच्या काट्यावर आयुष्य मोजणारी ही आजची धावपळ, कुठे थांबू देत नाही. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं झालं आहे. उशीर म्हणजे नुकसान, थांबणं म्हणजे वेळेची नासाडी, असं आजचं गणित झालं आहे. पण याच बस स्टँडवर उभा राहून, आज अचानक एक वेगळाच काळ आठवला.
तो एक काळ होता…
जेव्हा बस येण्याची घाईच नसायची. तेव्हा आम्ही तासंतास बसची वाट पाहायचो. बस उशिरा आली, रद्द झाली, दुसरी पकडावी लागली, काहीही झालं तरी ताण नव्हता, चिडचिड नव्हती. कारण तेव्हा वेळ आमच्यासोबत चालायचा. आज मात्र आपण वेळेमागे धावत आहोत, आणि तरीही तो गाठता येत नाही. कॉलेज सुटलं की थेट बस स्टँड. ते फक्त थांबायचं ठिकाण नव्हतं, ते आमचं दुसरं जग होतं. हातात दोन पुस्तकं, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत उत्सुकता. कोण येईल, कोण नाही, आज कोणती चर्चा रंगेल याची आतुरता असायची. मित्र, मैत्रिणी, ओळखीचे चेहरे, कधी कधी एखादी अनोळखी पण हळूहळू आपली होणारी व्यक्ती. चहाच्या टपरीवरचा तो उकळता चहा, भेळीचा कागदी कोन, वडापावचा वास, आणि त्यासोबत न संपणाऱ्या गप्पा. कोणी भविष्याची स्वप्नं रंगवायचं,“आपण मोठं काहीतरी करूया,”कोणी सरकारी नोकरीची स्वप्नं पाहायचं, कोणी गाव सोडून जायचं स्वप्न पाहायचं, तर कोणी कुठेच न जाण्याचं. कोणी एखाद्या प्रेमकथेचा हळूच उल्लेख करायचं, नाव न घेता, पण सगळ्यांना कळेल अशा शब्दांत. कोणी शिक्षकांवर टीका करायचं,कोणी कॉलेजच्या व्यवस्थेवर, तर कोणी थेट संपूर्ण समाजावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं.त्या गप्पांमध्ये ना मोबाईल होता, ना नोटिफिकेशनचा आवाज, ना कॉल कट झाल्याची घाई. फक्त हसणं होतं, ऐकणं होतं, आणि मनसोक्त जगणं होतं.
तेव्हा बस स्टँड म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नव्हतं. ते एक थांबलेलं आयुष्य होतं, जिथे वेळ थांबायचा, क्षण अनुभवले जायचे, आणि माणसं माणसांसोबत असायची. आज तोच बस स्टँड आहे. तोच रस्ता, तोच फलक, तीच चहाची टपरी. पण चेहरे बदललेत. आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. हेडफोन कानात, डोळे स्क्रीनवर, आणि मन कुठे तरी दूर. नात्यांची जागा हेडफोननी घेतली आहे, गप्पांची जागा स्क्रीनने, आणि भेटींची जागा “स्टेटस” आणि “रील्स”नी.
आज बस उशिरा झाली तर चिडचिड होते. तक्रार करावीशी वाटते.कोणाला तरी दोष द्यावासा वाटतो. कारण आज वेळ कमी आहे. आणि आठवणींसाठी वेळच उरलेला नाही. बस येते, मी चढतो, प्रवास सुरू होतो. पण मन मात्र मागेच राहून जातं, त्या काळात, त्या मित्रांमध्ये, त्या निष्काळजी, निर्मळ दिवसांमध्ये.
खरंच, तेव्हा बसची वाट पाहणं कंटाळवाणं नव्हतं.तो एक अनुभव होता. एक जगणं होतं. एक शिकवण होती, की आयुष्य म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर थांबणंही आहे. आज बस येण्याची वाट पाहतो, पण त्या काळाची बस कधीच येणार नाही… हे उमगूनही मन मात्र दरवेळी त्या जुन्या बस स्टँडवर थोडा वेळ थांबतंच. कारण काही जागा, काही क्षण, आणि काही माणसं, काळाच्या पुढे जात नाहीत, ती मनातच थांबलेली असतात, कायमची.