शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

यमुना

- विलास खैरनार 

         यमुना जेव्हा जेव्हा गावात यायची, तेव्हा तिची पावलं नकळत गावाच्या कडेला वळायची. तिथं एक छोटीशी टेकडी होती, मातीची, झाडांनी वेढलेली, आणि काळाच्या ओघात थकलेली. त्या टेकडीवर प्राचीन काळातलं एक मंदिर होतं. कुणी सांगितलं नव्हतं तिला तिथं जायला; तरीही तिचं मन तिथंच ओढलं जायचं.
मंदिराची पायरी चढताना तिचं काळीज नेहमीच भरून यायचं. त्या दगडी पायऱ्यांवरून चालताना तिला वाटायचं, आपण फक्त वर चढत नाहीये, तर आठवणींच्या खोल गर्भात उतरतोय.
        हे मंदिर फक्त देवासाठी नव्हतं, ते साक्षीदार होतं.
याच मंदिरात, या टेकडीवर, तुका आणि यमुनाची भेट झाली होती.
      तुका गावातला साधा मुलगा. वडिलांची लहानशी शेती, आईचं कष्टाचं आयुष्य. त्याच्या हातात कायम मातीची रेघ होती. तो कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या शब्दांत प्रामाणिकपणा असायचा. यमुना मात्र वेगळी होती, श्रीमंत घरातली, नाजूक, शिकलेली, डोळ्यांत स्वप्नं घेऊन फिरणारी.
       सुरुवातीला त्यांच्या भेटी योगायोग होत्या. यमुना देवाला नमस्कार करायला यायची, तुका मंदिर साफ करायला. हळूहळू ते योगायोग सवयी झाले. रोज संध्याकाळी, सूर्य मावळतीला झुकला की, दोघं त्या टेकडीवर भेटू लागले.
      मंदिराच्या घंटानादात त्यांचं बोलणं हरवायचं. ते मोठ्या स्वप्नांची चर्चा करत नसत; ते साध्या गोष्टी बोलायचे पावसाबद्दल, शेतीबद्दल, आयुष्याबद्दल. पण त्या साधेपणातच प्रेम रुजत गेलं.
          तुका जाणून होता आपली गरिबी. यमुना जाणून होती आपली मर्यादा. तरीही दोघं त्या सत्यापासून दूर पळत होते. मंदिराच्या सावलीत त्यांना सगळं शक्य वाटायचं. पण गाव लहान असतं आणि अफवा वेगाने पसरतात. यमुनाच्या घरात तिचं लग्न ठरल्याची बातमी आली. श्रीमंत घराणं, मोठा व्यवसाय. घरात आनंद होता; फक्त यमुनाच्या मनात शांतता नव्हती. तिने शेवटच्यांदा मंदिरात येऊन देवापुढं डोळे मिटले. त्या दिवशी तुका आला नाही. तो आला असता, तर कदाचित ती कोसळली असती.
          लग्नानंतर यमुना गावातून निघून गेली. टेकडी ओस पडली. मंदिर शांत झालं. तुकाचं आयुष्य मात्र तिथंच थांबलं. तो रोज मंदिरात जायचा, एकटाच. देवाला काही मागायचा नाही; फक्त बसून राहायचा. कधी कधी त्याला वाटायचं, यमुना अजूनही त्या पायऱ्या चढत येईल.
पण एक दिवस गावात बातमी आली, तुकाचं निधन झालं. कारण कुणालाच नीट माहीत नव्हतं. कुणी आजार म्हणालं, कुणी दु:ख. पण तुकालाच कारण माहीती; तो फक्त वेदना सोबत घेऊन गेला होता. तुकाचे अश्रू जणू टेकडीच्या मातीत मिसळून गेले. आता तुका या दुनियेत नव्हता, होत्यात फक्त आठवणी
      आता यमुना गावात आली की, तिला ते सगळं आठवतं. मंदिर, टेकडी, तुका आणि अपूर्ण राहिलेलं प्रेम. मंदिराच्या दगडांवर हात फिरवताना तिच्या डोळ्यांत पाणी येतं. ती रडते नशिबावर, समाजावर, आणि त्या प्रेमावर, ज्याला नाव मिळालं नाही. मंदिर अजूनही उभं आहे. टेकडी अजूनही तिथंच आहे. फक्त काही प्रेमकथा देवाजवळ जाऊनही पूर्ण होत नाहीत त्या फक्त आठवण बनून राहतात. समाजाच्या भिंती कधी कधी माणसांपेक्षा उंच असतात. प्रेम देवळात फुलतं, पण जगाच्या वास्तवात कोमेजतं. तरीही काही आठवणी माणसाला आयुष्यभर माणूस म्हणून जिवंत ठेवतात.

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

आजचा मिडिया

मिडीयाचा कॅमेरा आता आरसा राहिला नाही
तो मालकाच्या तिजोरीकडे वळलेला आहे
माईक सत्याचा आवाज नाही
तो सौद्याची पावती बनला आहे

काल जो प्रश्न विचारायचा सत्तेला
तो आज स्क्रिप्ट वाचतो आहे
शाई विकली गेली आहे
कागद गहाण पडला आहे

रक्त वाहतंय रस्त्यावर
पण ब्रेकिंग न्यूजमध्ये
सेलिब्रिटीचा कुत्रा हरवलाय

लोकशाही चौथा स्तंभ म्हणे
पण हा स्तंभ आता
सत्तेच्या पायाशी
लोटांगण घालतोय!

जे बोलले ते देशद्रोही
ज्यांनी प्रश्न विचारले ते अर्बन नक्षल
अन् जे गप्प बसले
तेच “वरिष्ठ संपादक”!

तरीही…
एखादा तरी पत्रकार अजून जिवंत आहे
जो भीक न मागता प्रश्न विचारतो आहे
जो दलालीपेक्षा ही
अंतरात्म्याला मोठं मानतो आहे
त्यांच्यासाठी ही फक्त एक कविता आहे
अन् त्या दलालांसाठी एक इशारा आहे
                   - विलास खैरनार 

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

बस स्टँडवर उभा असलेला काळ

 - विलास खैरनार 

मी आज साक्री बस स्टँडवर शांत उभा होतो. डोळे रस्त्याकडे लागलेले, कानात वाहनांचा आवाज, हातात मोबाईल, आणि मनात एकच विचार,बस केव्हा येईल? घड्याळाकडे वारंवार पाहण्याची सवय लागली आहे. वेळेच्या काट्यावर आयुष्य मोजणारी ही आजची धावपळ, कुठे थांबू देत नाही. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं झालं आहे. उशीर म्हणजे नुकसान, थांबणं म्हणजे वेळेची नासाडी, असं आजचं गणित झालं आहे. पण याच बस स्टँडवर उभा राहून, आज अचानक एक वेगळाच काळ आठवला.

तो एक काळ होता…

जेव्हा बस येण्याची घाईच नसायची. तेव्हा आम्ही तासंतास बसची वाट पाहायचो. बस उशिरा आली, रद्द झाली, दुसरी पकडावी लागली, काहीही झालं तरी ताण नव्हता, चिडचिड नव्हती. कारण तेव्हा वेळ आमच्यासोबत चालायचा. आज मात्र आपण वेळेमागे धावत आहोत, आणि तरीही तो गाठता येत नाही. कॉलेज सुटलं की थेट बस स्टँड. ते फक्त थांबायचं ठिकाण नव्हतं, ते आमचं दुसरं जग होतं. हातात दोन पुस्तकं, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत उत्सुकता. कोण येईल, कोण नाही, आज कोणती चर्चा रंगेल याची आतुरता असायची. मित्र, मैत्रिणी, ओळखीचे चेहरे, कधी कधी एखादी अनोळखी पण हळूहळू आपली होणारी व्यक्ती. चहाच्या टपरीवरचा तो उकळता चहा, भेळीचा कागदी कोन, वडापावचा वास, आणि त्यासोबत न संपणाऱ्या गप्पा. कोणी भविष्याची स्वप्नं रंगवायचं,“आपण मोठं काहीतरी करूया,”कोणी सरकारी नोकरीची स्वप्नं पाहायचं, कोणी गाव सोडून जायचं स्वप्न पाहायचं, तर कोणी कुठेच न जाण्याचं. कोणी एखाद्या प्रेमकथेचा हळूच उल्लेख करायचं, नाव न घेता, पण सगळ्यांना कळेल अशा शब्दांत. कोणी शिक्षकांवर टीका करायचं,कोणी कॉलेजच्या व्यवस्थेवर, तर कोणी थेट संपूर्ण समाजावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं.त्या गप्पांमध्ये ना मोबाईल होता, ना नोटिफिकेशनचा आवाज, ना कॉल कट झाल्याची घाई. फक्त हसणं होतं, ऐकणं होतं, आणि मनसोक्त जगणं होतं.

तेव्हा बस स्टँड म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नव्हतं. ते एक थांबलेलं आयुष्य होतं, जिथे वेळ थांबायचा, क्षण अनुभवले जायचे, आणि माणसं माणसांसोबत असायची. आज तोच बस स्टँड आहे. तोच रस्ता, तोच फलक, तीच चहाची टपरी. पण चेहरे बदललेत. आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. हेडफोन कानात, डोळे स्क्रीनवर, आणि मन कुठे तरी दूर. नात्यांची जागा हेडफोननी घेतली आहे, गप्पांची जागा स्क्रीनने, आणि भेटींची जागा “स्टेटस” आणि “रील्स”नी.

आज बस उशिरा झाली तर चिडचिड होते. तक्रार करावीशी वाटते.कोणाला तरी दोष द्यावासा वाटतो. कारण आज वेळ कमी आहे. आणि आठवणींसाठी वेळच उरलेला नाही. बस येते, मी चढतो, प्रवास सुरू होतो. पण मन मात्र मागेच राहून जातं, त्या काळात, त्या मित्रांमध्ये, त्या निष्काळजी, निर्मळ दिवसांमध्ये.

खरंच, तेव्हा बसची वाट पाहणं कंटाळवाणं नव्हतं.तो एक अनुभव होता. एक जगणं होतं. एक शिकवण होती, की आयुष्य म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर थांबणंही आहे. आज बस येण्याची वाट पाहतो, पण त्या काळाची बस कधीच येणार नाही… हे उमगूनही मन मात्र दरवेळी त्या जुन्या बस स्टँडवर थोडा वेळ थांबतंच. कारण काही जागा, काही क्षण, आणि काही माणसं, काळाच्या पुढे जात नाहीत, ती मनातच थांबलेली असतात, कायमची.




शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

कर्णाचा प्रश्न

कृष्णा...!
तू देव? 
की रणाचा नट?
तू बोललास धर्म, 
पण चाललास कपट!
माझ्या रथाचं चाक चिखलात अडलं,
अन् तू हसलास  
"मार अर्जुना, वेळ आली!" 
असं म्हणालास...

हेच का तुझं धर्मयुद्ध, 
हेच का तुझं गीतेचं तत्त्व?
कमकुवत क्षणी प्रहार, 
हीच का तुझी नीती वचने?
मी धनुष्य खाली ठेवला 
अन् तू माझा जीव घेतला 

मी दानशूर होतो, 
पण नशिबानं फुटका होतो,
जातीनं सुतपुत्र, 
म्हणून मी हरलो का?
देवाचा मित्र असूनही, 
देवानेच मला फसवलं,

कृष्णा...!
अजूनही मनात एकच प्रश्न आहे 
हे तुझं देवत्व होतं 
की राजकारण होतं?
             - विलास खैरनार

जीवाभावाचा मित्र

माझा मित्र
जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो 

प्रत्येक संध्याकाळ येते 
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी

डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं

मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत

त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली 

तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी

कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण, 
जिवंत कविता
           - विलास खैरनार