मंगळवार, ९ जून, २०२६

जनगणना : एक अस्मरणीय अनुभव

- विलास खैरनार

       नुकतेच आम्ही इयत्ता अकरावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांच्या कामातून बाहेर पडलो होतो. पेपर तपासणी, विविध कमिट्या, मिटिंग्स आणि सततची धावपळ यामुळे शरीर थकून गेलं होतं; पण शिक्षकाचं आयुष्य हे थांबायला शिकवत नाही. अशातच एका दुपारी मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला, “भारतीय जनगणना २०२६-२७.”
       मेसेज वाचताच मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. देशाच्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड झाली, ही जाणीव अभिमानाने भरून टाकणारी होती.
         आमच्या महाविद्यालयातील कामात तत्पर, जबाबदार आणि होतकरू अशा बारा प्राध्यापकांची भारतीय जनगणना आयोगाने निवड केली होती आणि त्यात माझाही समावेश होता. सुरुवातीला हे काम साधंसोपं वाटत होतं; पण पुढचे काही दिवस आयुष्यातील वेगळे अनुभव देणारे ठरणार आहेत, याची कल्पना तेव्हा नव्हती.
     जनगणनेचं प्रशिक्षण सुरू झालं आणि त्याचसोबत उन्हाळ्याची तीव्रताही वाढू लागली. बाहेर तापमान चाळीस-पंचेचाळीस अंशांच्या घरात पोहोचलं होतं. प्रशिक्षण हॉलमध्ये पंखे होते; पण ते फक्त नावालाच फिरत होते. खरं तर आमच्यासोबत ते पंखेसुद्धा घामाघूम झाले होते. सगळे जण खिडकीजवळ जागा पकडण्यासाठी धडपड करत होते. मलाही वाटायचं की खिडकीत बसलं तर थोडा गारवा मिळेल; पण तिथून येणारी हवा म्हणजे जणू गरम भट्टीतून बाहेर पडणारी वाफ होती. ती थेट चेहऱ्यावर आदळायची आणि घाम आणखी वाढवायची.
       समोर प्रशिक्षण देणारे अधिकारी मात्र इतक्या जोशात जनगणनेचं महत्त्व सांगत होते की जणू आम्हाला थेट सीमारेषेवर पाठवणार होते. देशासाठी हे काम किती महत्त्वाचं आहे, प्रत्येक नागरिकाची माहिती देशाच्या विकासासाठी किती आवश्यक आहे, हे ते इतक्या आवेशाने सांगत होते की नकळत छाती अभिमानाने भरून आली.
इतक्यात महाविद्यालयातून फोन आला,
“अकरावीचा निकाल तयार करायचा आहे.”
आता खरी कसरत सुरू झाली. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत गरमीत प्रशिक्षण घ्यायचं आणि मग घरी जाऊन निकालाचं काम करायचं. दिवसभराच्या उकाड्याने शरीर थकून जायचं; पण जबाबदारी टाळणं शक्य नव्हतं. अशा कठीण परिस्थितीतून अखेर तीन दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण झालं.

प्रशिक्षण संपलं आणि आता सुरू झालं जनगणनेचं खरं काम.

      आम्हाला दिलेल्या परिसराचा नकाशा तयार करायचा होता. प्रत्येक इमारतीला क्रमांक द्यायचा होता. सुरुवातीला हे काम थोडं तांत्रिक वाटलं; पण जसजसं काम पुढे जाऊ लागलं, तसं त्या परिसराशी आणि तिथल्या लोकांशी एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं.
दररोज सकाळी ओळखपत्र, पाण्याची बाटली आणि डोक्यावर उन्हाचा तडाखा घेऊन आम्ही घराघरात फिरू लागलो. प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती घ्यायची. प्रश्नांची यादी इतकी मोठी होती की काही वेळा मलाच वाटायचं “हे आपण जनगणना करतोय की मुलाखत घेतोय?”
“तुमच्या घरात किती लोक राहतात?”
“लग्न झालेले जोडपे किती?”
“तुम्ही रेडिओ ऐकता का?”
“टीव्ही पाहता का?”
“केबल आहे की डीटीएच?”
“नळाला पाणी येतं का?”
“सांडपाणी कुठे जातं?”
“बंद गटारात की उघड्यावर?”
“जास्त काय खाता - गहू की तांदूळ?”
असे तब्बल चौतीस प्रश्न विचारायचे होते.
पण खरी गंमत प्रश्न विचारण्यात नव्हती; तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, हावभाव आणि प्रतिक्रिया समजून घेण्यात होती. एका घरासाठी किमान दहा मिनिटं लागत होती. त्यातली पाच मिनिटं तर फक्त दरवाजा उघडायला जात होती. मी बेल वाजवली की आतून मोठा आवाज यायचा 
“कोण आहे?”
मी उत्तर द्यायचो 
“जनगणना करायला आलो आहे.”
मग दरवाजा हळूच उघडायचा. सकाळची वेळ असेल तर काही जण डोळे चोळत, आळस देत बाहेर यायचे. काही लोक तर फक्त अंडरवेअरवरच दरवाज्यात उभे राहत होते. त्या क्षणी हसूही आवरायचं आणि कामही करायचं. मग मी मनातच म्हणायचो 
“आता याची गणना नेमकी कशी करायची?”

काही लोक अतिशय प्रेमाने बोलायचे. पाणी द्यायचे, खुर्ची द्यायचे. तर काही लोकांना संशय वाटायचा की आपण सरकारी अधिकारी नसून कदाचित काहीतरी वेगळंच काम करतोय.
एक कुटुंब तर थेट म्हणालं 
“आम्हाला जनगणना करायची नाही.”
त्यावेळी मलाही थोडा अधिकार दाखवावा लागला. मी शांतपणे म्हणालो 
“माहिती दिली नाही तर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकतं.”
माझं वाक्य ऐकताच पूर्ण कुटुंब गंभीर झालं. मग त्यांनी अगदी नीटपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्या प्रसंगानंतर मला जाणवलं की सरकारी कामामध्ये संयमाइतकाच आत्मविश्वासही महत्त्वाचा असतो.

      एका घरी गेलो तर घरात एकच व्यक्ती होती आणि तीही दारू पिऊन गोंधळलेल्या अवस्थेत. आता त्याला भारतीय जनगणना आयोगाचे चौतीस तत्त्वनिष्ठ प्रश्न विचारायचे होते! तिथून कसाबसा पुढे गेलो तर एका बाईंनी मला पाहताच दरवाजा बंद केला. त्यांनी जणू मला एखादा “बोवा”च समजलं असावं.
मी खिशातून रुमाल काढला, घाम पुसला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो 
“अहो मावशी… दरवाजा उघडा!”
इतक्यात पूर्ण कॉलनीच त्या घराजवळ जमा झाली. माझा हा तमाशा तब्बल अर्धा तास चालला; पण त्या मावशींनी काही दरवाजा उघडला नाही. शेवटी मी हार मानली आणि तिथून निघून गेलो.
        एक माणूस तर इतका संशयी होता की त्याने माझे फोटो काढले, तेही आयडी कार्डसह! जणू मी त्याच्या मालमत्तेवर कब्जा करायला आलो होतो.
त्या क्षणी हसू आवरत नव्हतं; पण त्याचवेळी लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल किती शंका आणि भीती असते, हेही लक्षात आलं.

        या सगळ्या प्रवासात अनेक प्रकारची माणसं भेटली. काही श्रीमंत, काही गरीब, काही शिक्षित, काही अशिक्षित; पण प्रत्येक घरामागे एक वेगळी कथा होती. कुठे वृद्ध आई-वडील एकटे राहत होते, कुठे लहान मुलांच्या गोंधळाने घर भरलेलं होतं, तर कुठे दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणारी माणसं दिसत होती.
त्या ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात फिरताना शरीर थकलं, चेहरा काळवंडला, पाय दुखले; पण मन मात्र अनुभवांनी समृद्ध झालं.
जनगणना हे फक्त आकडे मोजण्याचं काम नाही, तर देशातील माणसं, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं वास्तव जवळून पाहण्याची संधी आहे.
या कामाने मला संयम शिकवला, लोकांशी संवाद साधायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरामागे एक संघर्ष दडलेला असतो, याची जाणीव करून दिली.
      आता काही प्रसंगांची आठवण आली की चेहऱ्यावर नकळत हसू येतं. उन्हाचा तडाखा, लोकांचे वेगवेगळे स्वभाव, घराघरातील अनुभव आणि त्या चौतीस प्रश्नांची अखंड मालिका, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
खरंच, जनगणना हे माझ्यासाठी फक्त सरकारी काम नव्हतं;
तो आयुष्य समजून घेण्याचा एक अस्मरणीय अनुभव होता.