"गाव बदललंय" हे वाक्य आजकाल खूप सहज ऐकायला मिळतं. पण खरंच गाव बदललंय का? की गावाला गावपण देणारा माणूसच हरवत चाललाय?
पूर्वी गावात रस्ते कमी होते, पण माणसांमधले रस्ते खुले होते. आज डांबरी रस्ते झाले, पण मनांमधल्या वाटा कायमच्या बंद झाल्या. प्रत्येक घरावर सिमेंटचं छप्पर आलं, पण नात्यांवर मात्र स्वार्थाचं छप्पर चढलं.
आधुनिकतेच्या नावाखाली आपण विकासाच्या घोषणा करतो. उंच इमारती, चौपदरी रस्ते, इंटरनेट, मॉल, स्मार्टफोन यालाच विकास मानलं जातं. पण गावातल्या ओस पडलेल्या चावडीचा, शांत झालेल्या मंदिराच्या पाराचा, रिकाम्या विहिरीचा आणि बंद पडलेल्या शाळेचा हिशोब कोण मांडणार?
एकेकाळी गावात कुणा एकाच दुःख हे सगळ्या गावाचं दुःख असायचं. आज शेजाऱ्याचं नाव माहीत नसलेले लोक "सोशल" झालेत. मोबाईलमध्ये हजारो मित्र आहेत, पण संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा एकही माणूस नाही.
गावातून तरुण शहराकडे गेला, हे त्याचं स्वप्न होतं. पण त्याच्यासोबत गावाची उमेद, शेताची ताकद आणि संस्कृतीची मुळंही शहरात निघून गेली. मागे उरले वृद्ध आई-वडील, कुलूपबंद घरे आणि आठवणींवर जगणाऱ्या भिंती.
हा विकास आहे की विस्थापन?
ज्या मातीत जन्मलो, त्याच मातीत जगणं आज कमीपणाचं का वाटू लागलं? शेतात राबणारा बाप मागास समजला जातो आणि वातानुकूलित कार्यालयात बसणारा मुलगा यशस्वी ठरतो. श्रमाची किंमत कमी झाली आणि दिखाव्याची किंमत वाढली.
गावात आता सण होतात, पण उत्सव हरवलेत. जत्रा भरतात, पण मनं भेटत नाहीत. घरं मोठी झाली, पण कुटुंबं लहान झाली. पैसा वाढला, पण समाधान कमी झालं. आधुनिकतेने सुविधा दिल्या; पण माणुसकी हिरावून घेतली.
प्रश्न आधुनिकतेचा नाही. प्रश्न असा आहे की विकासाच्या नावाखाली आपण माणूसपण गहाण का ठेवलं? प्रगतीची व्याख्या जर फक्त सिमेंट, स्टील आणि मोबाईल नेटवर्कमध्ये अडकली, तर उद्या इतिहास लिहीला जाईल, गाव वाचलं होतं, पण गावपण मेलेलं होतं.
आज गरज आहे ती नव्या रस्त्यांची नाही; तर तुटलेल्या नात्यांना जोडणाऱ्या वाटांची. नव्या इमारतींची नाही; तर जुन्या विश्वासाची. नव्या यंत्रांची नाही; तर माणसाच्या मनात पुन्हा माणूस जागवण्याची.
कारण गाव कधीच घरांचा समूह नसून. गाव म्हणजे माणुसकीचा श्वास असतो. आणि जर तोच श्वास गुदमरला, तर गाव हरवत जाईल आणि माणूस सुद्धा.