कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

कर्णाचा प्रश्न

कृष्णा...!
तू देव? 
की रणाचा नट?
तू बोललास धर्म, 
पण चाललास कपट!
माझ्या रथाचं चाक चिखलात अडलं,
अन् तू हसलास  
"मार अर्जुना, वेळ आली!" 
असं म्हणालास...

हेच का तुझं धर्मयुद्ध, 
हेच का तुझं गीतेचं तत्त्व?
कमकुवत क्षणी प्रहार, 
हीच का तुझी नीती वचने?
मी धनुष्य खाली ठेवला 
अन् तू माझा जीव घेतला 

मी दानशूर होतो, 
पण नशिबानं फुटका होतो,
जातीनं सुतपुत्र, 
म्हणून मी हरलो का?
देवाचा मित्र असूनही, 
देवानेच मला फसवलं,

कृष्णा...!
अजूनही मनात एकच प्रश्न आहे 
हे तुझं देवत्व होतं 
की राजकारण होतं?
             - विलास खैरनार

जीवाभावाचा मित्र

माझा मित्र
जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो 

प्रत्येक संध्याकाळ येते 
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी

डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं

मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत

त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली 

तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी

कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण, 
जिवंत कविता
           - विलास खैरनार 

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानोबा

ज्ञानोबा...
तु शब्दांचा महासागर असतांना 
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.

तु लिहीत गेलास गीतेतील ओवी, 
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी

वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,  
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास 
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."  
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला 
फक्त भावनांची बोली उरली,  
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.

तु सांगशील का, ज्ञानोबा,  
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?  
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?

तुच शिकवलंस  
भक्ती म्हणजे प्रेम,  
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,  

कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी, 
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
                                         - विलास खैरनार 

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार 

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

साथ किसका?

हमें पत्थर मारने वालों में
वो भी साथ थे…!
जिनके गुनाह कभी हम
अपने सर लिया करते थे…!

कितनी अजीब होती है ये दुनिया,
चेहरे हँसते रहे पर दिलों में नक़्शे बदलते रहे।
हम समझते रहे जिन्हें अपना साया,
वो ही तिरछी धूप बनकर निकलते रहे।

हमने जिनके दर्द को अपनी चुपी में छुपाया,
वो ही आज हमारी आवाज़ का मज़ाक उड़ाते रहे।
जिनके लिये हम रातों को जागे,
वो ही सुबह हमें पत्थर दिखाते रहे।

लेकिन ज़िन्दगी का हिसाब बड़ा साफ़ होता है
कौन अपना, कौन पराया…
आख़िर वक्त ही बता देता है।

हम गिर भी जाएँ तो क्या?
हमारी रूह नहीं टूटने वाली
क्योंकि धोखा देने वाले बहुत मिले,
पर दिल से चाहने वाले
अब भी थोड़े सही, लेकीन सच्चे मिले.
                      - विलास खैरनार 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

तुझ्या लग्नाच्या दिवशी



तुझ्या लग्नाच्या दिवशी,
मी गावातच होतो
तु फुलांनी नटलेली होतीस,
अन् मी आठवणींत अडकलो होतो.

नाही आलो मी तुझ्या लग्नाच्या मंडपात,
पण मन मात्र तुझ्याच भवती फिरत होतं 
तुझ्या नजरें आड तुलाच बघतं होतं,

तुला हळद लागली तेव्हा  
तु सोन्यासारखी चमकत होती
पण त्या पिवळ्या रंगाखाली
दडलेली तुझी वेदना फक्त मलाच दिसत होती

नगाऱ्यांच्या आवाजात
माझं मन शांत झालं होतं 
सनईच्या सुरात
नाव माझं कुठे दिसतं नव्हतं.

हसत होते सर्व 
अन् तु शांतपणे रडत होती
डोळ्यांत येणारं पाणी 
तु हळुवार पुसत होती

सात फेरे घेताना, तुझा तोल गेला 
लोक म्हणाले " तु जरा घाबरलीस",
पण मला जाणवलं,
तू तेव्हा माझ्या आठवणीत अडकलीस

तेव्हाच....
तुझ्या पायातील पैजणांचा एक घुंगरू,
घसरत माझ्या पायांजवळ आला,
वाकून मी तो उचलला,
तेव्हा त्यावर दिसत होती
तुझ्या मेहंदीची हलकी छटा,
अन् सुगंध तुझ्या अंगाचा,
तुझ्या ओंजळीचा...

पण लगेच आठवलं,
तो तुझ्या नव्या आयुष्याचा होता...

मी तो शांतपणे मुठीत बंद केला 
अन् मागे सरकलो,
त्या नव्या वाटेवर
माझ्या प्रेमाला अर्पण करत होतो

आता मी जेव्हा जेव्हा गावात जातो,
अन् त्याच ठिकाणी उभा राहतो,
तुझ्या लग्नाचा तो दिवस
दरवर्षी पुन्हा पुन्हा आठवतो 
             - विलास खैरनार 

स्मशानभूमी

 

रात्रीचा गडद अंधार उतरला
आकाशातला चंद्रही थकला
एक थंड वाऱ्याची झुळूक आली
आणि माझा पाऊल स्मशानभूमीत पडला

जवळच एका कावळ्याने काव केला 
जणू तु मला सांगत होता 
"इथं सगळ्यांनी येऊन गप्प व्हायचं असतं,
आवाजही इथे अर्थ हरवतो..."

एका चितेचा धूर आकाशाला भिडला
त्यात कुणाचं आयुष्य धुरासारखं विरलं होतं 
जणू कुणाचं स्वप्नं जळत होतं
कुणाचं हास्य, कुणाचं बालपण
एकेक लाकडं जळताना मी बघत होतो

त्या राखेतून उठणाऱ्या वाऱ्याने
माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला
अन् मला जाणवलं 
मृत्यूही किती शांत असतो
जीवनाच्या कोलाहलापेक्षा अधिक जिवंत असतो

स्मशानभूमी 
ही फक्त शेवटाची जागा नाही
ही सुरुवातीची जाणीव आहे
माणसाची शेवटी फक्त मातीच आहे

जिथे श्रीमंत-गरीब एकाच जागेवर येतात
जिथे अहंकार, पैसा, कीर्ती 
सगळं एकाच राखेत मिसळतात

त्या राखेखाली कित्येक कथा आहेत
कुणाचं अपूर्ण प्रेम
कुणाचं मोडलेलं आयुष्य
कुणाचं न सांगितलेलं सत्य

कधी कधी एखादा वाऱा वाहतो
तो जणू त्यांचाच श्वास असतो
जे अजून काही सांगू इच्छितात 
पण त्यांची भाषा आता राख झाली आहे

मी त्या रात्री बऱ्याच वेळ बसलो
त्या शांततेत
त्या राखेच्या सुगंधात
त्या मृत्यूसारख्या जिवंत क्षणात

आणि मला जाणवलं 
स्मशानभूमी भयाण नाही
ते सत्य आहे…
जीवंत माणसांसाठी 
ठेवलेला तो एक आरसा आहे

जिथे प्रत्येकाला दिसतं 
की आयुष्य किती क्षणभंगुर आहे
अन् प्रेमच एकमेव शाश्वत आहे

त्या राखेतून उठणाऱ्या धुरासारखं
मीही एक दिवस विरून जाणार
पण कदाचित कुणाच्या आठवणीत
थोडा जिवंत राहीन
जसं स्मशानभूमीत
धुरानंतरही उरतो तो वास 
शांततेचा, शेवटाचा, आणि सुरुवातीचा
                        - विलास खैरनार 


रविवार, १ डिसेंबर, २०२४

मतदान


सर्वत्र शुकशुकाट होता
कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता

विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता

गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार

EVM घोटाळा


चारा,स्टॅम्प, 2G,
सिंचन,आदर्श
सर्व घोटाळे बघितले

आज पहिल्यांदा देव इंद्राचा
EVM घोटाळा बघितला
अन् मीच माझ्या डोक्याला हात लावला
अरे हा तर
सर्वच घोटाळे बाजांचा बाप निघाला
सर्व मंत्री मंडळच याने काबिज केला

थोडी तरी लाज वाटू दिली असती
किमान विधानसभेत बोलतांना
तुमची मान खाली गेली नसती

अरे घोटाळ्यांची
कशी ठेवणार तुम्ही मापं
अन्
कुठं फेडणार एवढी पापं

शेतकऱ्या तु तर
खुले आम कापला गेला
EVM च्या कोयत्यावर
कारण आता
विधानसभेत कोणीच
नाही तुझ्या बऱ्यावर
अरे
विरोधकच गेलाय
आता वाऱ्यावर

आज शहीद, हुतात्मे
सर्व रडले असतील
भारत माते समोर
खून केला तुम्ही
लोकशाहीचा
संविधाना समोर
- विलास खैरनार

प्रचार


तुमच्या प्रचारासाठी आलेल्या गाड्या
फक्त माझ्या गावाच्या बस स्टॅण्ड पर्यंतच येतील
पुढे तुम्हाला सार्वजनिक मुतारीच्या बाजूने
गटारीतून उडी घेत
शिवाजी चौकापर्यंत जावं लागेल,

नंतर तुम्हाला तुटलेल्या कवलांची
अन् पडलेल्या भिंतींची
जिल्हा परिषदेची शाळा दिसेल
शाळेतील फाटक्या कपड्यातील
कळकटलेले पोरं तुमच्याकडे पाहतील
त्या पोरांकडे बघून तुम्हाला किळसवाण वाटेल
पण तिथूनच तुम्हाला उकीरड्यातून नाक धरून
पुढे वस्तीत जावं लागेल

तिथे गेल्यावर आठ दहा पोरांचा घोळका
बसलेलला दिसेल
कोणाच्या हातात पत्ते,
कोणाच्या हातात बिडी तर दारूचा ग्लास ही असेल
तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका
ते तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल
अन् दुष्काळात तुम्ही आमच्यासाठी काय केलं?
कोणी काहीच विचारणार नाही
त्यांना तुम्ही तुमच्या जवळ असलेले
वांझोटे स्वप्ने दाखवा

त्याच वाट चुकलेल्या पोरांना
तुम्ही तुमची पुढची वाट विचारा
नाहीतर...
समोरच्या भिंतीवर "रोजगार हमी योजना"
अन् "मनरेगा" अस लिहिलेलं दिसेल
तिथूनच मोठ मोठे खड्डे असलेला रस्ता
तुम्हाला दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाईल.
तुमच्या प्रचारासाठी...
- विलास खैरनार

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

भांडण

भांडण

आज जोराचे भांडण झाले
तिचं आणि माझं

प्रश्न अन् उत्तरांनी
तुफान राडा केला
वर्ष भराच्या रागाचा
वर्षाव तिथे झाला

शब्दाला शब्द भिणला
भावनांचा कल्लोळ झाला

भांडण फक्त तिच्यात
अन् माझं
तिसरं तिथे
कोणीच नव्हतं

भांडण मिटता मिटत नव्हतं
कारण फक्त भेटीच होतं

भांडण टोका पर्यंत आले
दूर होण्याचे विचार झाले
शेवटचे सर्व निर्णय
तिने माझ्यावर सोडले

मग मी ही स्वतः ला शांत केलं
थोडं भूतकाळात डोकवलं
अन् तिच्याकडे बघितलं

तिला जवळ घेतलं
तिचे अश्रू पुसत
तिला मिठीत घेतलं
अन्
दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटलं

दोन तासापासून
सुरू असलेलं भांडण
एका सेंकदात मिटलं
- विलास खैरनार

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

संवेदना

 


मनात पडलेला
भावनांचा सडा
कळत नकळत
मंतरलेल्या क्षणांची
संवेदनांच्या डोहात वलये
निर्माण करतात

मग वाटत
पकडावा शब्दांचा हात
जावं स्मृतीच्या घरट्यात
अन्
घ्यावा विसावा वेदनांसमवेत
- विलास खैरनार

तुला बरंच काही सांगायच होत


तुला बरंच काही सांगायच होत
पण नंतर आपली भेट झालीच नाही

मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात
अखेरच तुला भेटण्यासाठी
डोळे भरून बघण्यासाठी

पण तेव्हा तुझे डोळे पाणावलेले होते
म्हणून पाय माझे जागीच थांबले होते

डोळे माझे रडून सुकले होते
कारण तेही सुन्न झाले होते

मला खरंच तिथे यायचे नव्हते
तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते

पण तुला दिलेलं वचन मला मोडायचे नव्हते
आणि तु दूर जाताना मला बघायचे नव्हते

तसाच काळजावर दगड ठेवून
दगडासारखा उभा होतो
अखेरच डोळे भरून तुला बघत होतो
- विलास खैरनार


क्षण

 

काही क्षणासाठी
मी तुझ्या ह्दयात
घर करुन जाईल

विसरणं अशक्य
अशा आठवणी
देऊन जाईल
- विलास

तु, पाऊस आणि कविता

 

तु, पाऊस आणि कविता
मला खूप आवडतात
तुझ्या प्रेमाचा रंग उधळतो
पावसाच्या धारा कोसळतात
कविता हृदयात बहरतात
तुम्ही तिघेही मला
आनंदाच्या सरीत भिजवतात
म्हणूनच...
तु, पाऊस आणि कविता
मला खूप आवडता

वाह...! पावसा


वाह...!
पावसा
तुझ्यावर
आज दिल
खूश झाला

आठवण
तिची आली
आणि
येऊन तु गेला
- विलास खैरनार

राजभाषा


महाराष्ट्र माझ्या देशा
मराठी माझी भाषा
इथे आहे संतांची खाण
सोबत मराठीचे ज्ञान

थोर साहित्यिकांनी दिली
लेखनाला नवी दिशा
गगनाला लाजवून टाकी
अशी आमची राजभाषा

खान्देश, विदर्भ, मराठवाडा
ऐक्याचे प्रतिक दाखवतो,
दिल्लीच्या तक्तावरी
मराठीची तोफा गर्जवितो

पु.ल. च्या हास्यात रंगला
शिरवाडकरांच्या काव्यात भिजला
व.पु. च्या कथेत रमला
अशा अनेकांनी राजभाषेचा
अभिमान वाढवला

आहे महाराष्ट्रावर
मराठी बोलीची माया
अशा माझ्या महाराष्ट्र
देशावर संतांची छाया
- विलास खैरनार
- ०६/०३/२०२२

वेदनांची कविता

 


ती म्हणाली
कविता लिहून दाखवं
मी फक्त ह्दयावर हात ठेवला
आणि दुःखावर वार केला
तेव्हा विस्फोट झाला
मनावर....
मग कविता अवतरली
कागदावर....
५/१२/२०२१

मनाले सुत

 

अशांत मन माझं
तुझ्यात रंगले
मनाले सुत जणू
इथेच जुळले

प्रेम करावे कसे
हे तर तुच शिकवले
बेचैन मनाचे तु
बंध कसे ग जोडले
४/१२/२०२१

ती आणि मी



तुझं दूर जाणं म्हणजे
हवेविना श्वास घेणं
कोंडलेल्या श्वासासोबत
लपाछपी खेळत बसणं

ध्येयापर्यंत पोहोचलो
तरी किना-यावर येणं
लाटांच रुपात
तुला शोधत बसणं

उसळून बघेल मी
प्रत्येक किना-यावर
सागराला सांगून ठेवलं
परत नाही येणार
ती भेटतं नाही तोवर
३/१२/२०२१