गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा

- विलास खैरनार 

इंदुरीकर महाराज लोकप्रिय झाले ते त्यांच्या नवीन पद्धतीच्या कीर्तनशैलीमुळे. त्यांच्या अगोदरही अनेक कीर्तनकार झाले, पण अशा विनोदी भरलेल्या, जोरदार अभिनयाने सजलेल्या, कधी-कधी टोकाच्या टीकेने रंगलेल्या शैलीत कोणी बोलले नव्हते. ‘कॉमेडी कीर्तन’ हा शब्द कानावर पडायला लागला तो यांच्यामुळेच.पण त्यांच्या उपरोधिक टिप्पणींच्या धडाक्यात स्त्रियांविषयी अनेकदा कमीपणाची, हीन मानसिकतेची टीका ऐकू येत गेली, हेही तितकेच खरं. व्यसनाधीन युवकांवर त्यांनी झडर घातला, ते योग्यच; पण अनेक मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी मध्ययुगीनच वाटत असे. असो, विषय तो नाही. प्रश्न आहे त्यांच्या अलीकडील निर्णयाचा आणि त्यामागच्या दिलेल्या कारणाचा. अचानक ते म्हणाले "आता मी कीर्तन करणार नाही, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, कीर्तन करावं की करू नये. पण लोकांना मी घोडे लावलेत!" ही भाषा? आणि ही पद्धत कितपत योग्य?

वर्षानुवर्षे ते कीर्तनात सांगत आले, मुलींनी गॉगल लावू नये, मेकअप नको, वराती मध्ये नाच नको, खर्चिक लग्नं करू नयेत, गाडी-घोड्यांची मिरवणूक नको, मेनू साधा असावा, उधळपट्टी टाळा, लोक त्यावर टाळ्या पिटत, हसत, दाद देत.पण त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला मात्र, मोठा दिमाख, स्टाईलिश एंट्री, गॉगल, मेकअप, नाच, समारंभात भरपूर खर्च, आणि सगळे तेच "थेर" ज्यावर ते स्वतः वर्षानुवर्षे टीका करत आले. त्यांच्या मुलीला सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, हे साऱ्यांचंच मत आहे. पण तेच उपदेश करत राहणारे स्वतःला मात्र अपवाद समजून कसं चालणार?

ते सांगत होते की, वऱ्हाडी जमिनीवर बसले,वाढपी वारकरी पोशाखात, महिला पारंपरिक वेशात त्यांचे हे मुद्दे छानच आहेत पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले उपदेश त्यांनीच पाळले की नाही? त्यांनीच सांगितलं होतं “जेवण साधं असावं! एक लापशी, आमटी-भात पुरेसा!” पण त्यांच्या कार्यक्रमात? यादी पाहिली की त्यांचेच भाषण आठवतं. ज्यावर त्यांनी कडाडून टीका केली. 

लोकांवर उपदेश करणाऱ्यांचे आचरण अधिक कसोशीने तपासले जाते हेच इंदुरीकर महाराज विसरले. लोकांना चार गोष्टी सुनावणारा माणूस जेव्हा स्वतःच उलट वागतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. लोकांनी चूक दाखवली म्हणून त्यांच्यावर तेच नाराजी, त्रागा आणि "घोडे लावलेत!" अस बोलतात. ही भाषा आणि हा पवित्रा कीर्तनकारांना शोभणारा नाही. उपदेश करणारा स्वतः पाळत नसला तर त्याचा उपदेश तोंडाची वाफ ठरतो आणि हेच आज दिसलं. उपदेश एक आणि वर्तन दुसरे असेल तर तो दांभिकपणा ठरतो. संत परंपरेच्या नावाने बोलणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला नको का?

कीर्तन ही परंपरा म्हणजे फक्त विनोद, टिंगल, टाळ्या नव्हे, ती संस्कृती, प्रबोधन, विचार आणि नैतिकतेची साधना आहे.
“कीर्तन तेथेच, जिथे हिताचा संदेश असतो
आणि जिथे कीर्तन करावं तेथे अन्नाचा मोह नसावा" 
असे तुकाराम महाराज म्हणतात. ही मापदंडे आजचे सर्व कीर्तनकार पाळतात का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

इंदुरीकर महाराज जे काही होते आणि आजच्या परिस्थितीत तफावत दिसते म्हणूनच लोकांनी त्यांना आरसा दाखवला. हे स्वीकारणं कठीण जरी वाटलं तरी तेच योग्य आहे. प्रसिद्ध व्यक्ती कितीही मोठी असली तरी उपदेश करताना आणि आचरणात तफावत असेल तर समाज माफ करत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा