Showing posts with label ललितलेख. Show all posts
Showing posts with label ललितलेख. Show all posts

Monday, June 30, 2025

गावाकडची माणसं


 - विलास खैरनार 
         गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त्यांच्या जगण्याचासाधेपणा – हेच गावाचं खरं सौंदर्य असतं.
         गावाकडची माणसं म्हणजे गोड गोंधळ, एकमेकांना हाक मारणं, कुणी आजारी पडलं तर घरच्यासारखी काळजी करणं. कुणाच्या शेतात काम वाढलं की शेजारी मदतीला सरसावतात. "आपलं" आणि "तुमचं" यात फार फरक नसतो. हे लोक थेट आणि मनमोकळं बोलणारे असतात. त्यांच्या बोलण्यात बनावटपणा नसतो. त्यांच्या चेहऱ्यावर उन्हातान्हात राबून आलेला काळसरपणा असतो, पण डोळ्यांत एक खास चमक असते – माणुसकीची.
      गावाकडची म्हातारी मंडळी ही गावाची माहितीची शिदोरी असतात. त्यांच्या गोष्टींतून इतिहास बोलतो. गावकुसाच्या झाडाखाली बसून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये एक वेगळीच जादू असते. तर गावातली पोरं पावसात मस्त चिखलात खेळताना दिसतात – मोबाईलपेक्षा मोकळं आभाळ त्यांना आपलंसं वाटतं.
      गावाकडच्या बायकांची मेहनत कुणी मोजू शकत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कधी रानात, कधी अंगणात, कधी स्वयंपाकात गुंतलेल्या असतात. पण चेहऱ्यावर थकवा नाही – कारण त्या कामातूनच त्यांना समाधान मिळतं.
      शहराच्या झगमगाटात हरवलेली माणुसकी, गावात मात्र अजूनही शाबूत आहे. गावाकडची माणसं ही खरी भारताची ओळख आहेत – साधी, सरळ, आणि सच्ची.

Friday, December 17, 2021

विचार जिवंत पाहीजे


       जीवन जगताना आपण आपल्याच माणसांपासून दूर जातो, का ? कशासाठी? आजच्या धकाधकीच्या काळात माणूस माणूसपण विसरला आहे, किंबहूना माणूसकीच सोंग घेऊन माणूसपण दाखवतं आहे. 
       तरीही जीवन जगताना काही भूतकाळातील चांगल्या गोष्टी विसरून चालणार नाही कारण काही वेळेस भूतकाळाचं भविष्यकाळ घडवण्याचे धडे देतं असतो, जसा इतिहास वाचून छाती गर्वाने फुगून येते अगदी तसच वर्तमान सुध्दा अभिमानाने जगलो पाहीजे. 
           समाज बांधिलकीच्या माध्यमातून विचार केला तर माणूस अजून ही समाजाच्या चौकटीत अडकलाय, जोपर्यंत ही चौकट तुटत नाही किंवा नाहीशी होतं नाही तोपर्यंत सर्वधर्म समभावाच्या गोष्टी करणं निरर्थक आहे, वाईट व गंजलेल्या विचारांचा नाश झाला पाहीजे, नाहीतर हेच विचार देशाला घातक ठरू शकता. आधी माणूस जागा झाला पाहीजे तेव्हाच क्रांती घडेल, पण तरीही माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही त्याला क्रांतीकारी बनवं लागतं त्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे.
     कोणती संस्कृती जपतो आहोत आम्ही, आजही दाभोलकर, पानसरे अशा अनेक विचारवंतांच्या भर रस्त्यावर हत्या होता, मारेकरी फक्त व्यक्तींची हत्या करू शकता त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवालेल्या विचारांची नाही, इतिहास साक्षी आहे आम्ही समाज सुधारकांना जगू दिले नाही आणि नंतर त्यांच्या विचारांशिवाय आम्ही जगू शकत नाही, स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचीच प्रेत यात्रा बघणारे आगरकरांना आम्ही कसं विसरू शकतो, आम्ही फक्त महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो पण महासत्ता होण्यासाठी आम्ही करतो तरी काय ? नुसतं बोलून काही होणार नाही तर ते कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व अशा अनेक विचारवंतांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे तर आणि तरच आपण जगाच्या पाठीवर आपली ओळख ठामपणे करू शकतो.
                                        -विलास खैरनार 

   

Tuesday, October 20, 2020

गावाकडची माणसं

          आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न ! 

बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस! ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.

देवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.

एखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.

मोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.

म्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण! आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय!

खूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..!!


 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...