तु शब्दांचा महासागर असतांना
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.
तु लिहीत गेलास गीतेतील ओवी,
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी
वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला
फक्त भावनांची बोली उरली,
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.
तु सांगशील का, ज्ञानोबा,
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?
तुच शिकवलंस
भक्ती म्हणजे प्रेम,
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,
कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी,
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
- विलास खैरनार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा