सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा