शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

गावाकडचा प्रवास

- विलास खैरनार 

        गावाकडे जाणं म्हणजे केवळ प्रवास नसतो, तो आत्म्याच्या मुळांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. शहराच्या गोंगाटातून सुटका करून मी गावाकडे जायचं ठरवलं आणि एका सकाळी बॅग खांद्यावर टाकून बसस्थानकाच्या दिशेने निघालो. प्रवासात धावणारी झाडं, एकसारख्या लयीत चालणारी शेतं, अधूनमधून दिसणारी झोपडी, हे सगळं जणू माझ्या मनातल्या आठवणींची दारं उघडत होतं.

       बस गावात शिरताच मातीचा गंध जणू स्वागताला समोर उभा राहिला. छोट्या रस्त्यावरची कुत्र्यांची गडबड, दुकानासमोर उभ्या सायकली, आणि घराच्या ओट्यावर गप्पा मारणारे बाया, हे दृश्य इतकं ओळखीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की क्षणभर शहरातल्या धकाधकीबद्दल मनातल्या मनातच हसू आलं.

      घराच्या अंगणात पाय ठेवताच चुलीचा मंद धूर आणि आईचा आवाज दोन्ही कानावर पडले. “आलास का रे?” त्या एका वाक्यात कित्येक दिवसांची ओढ, काळजी, प्रेम सगळं सामावलेलं होतं.

        दुसऱ्याच दिवशी मी शेताकडे निघालो. पहाटेचं थंडगार हवामान, पाखरांचे किलबिलाट, आणि पायाखाली साचलेली दवबिंदूची ओल, हे सगळं मनात एका वेगळ्या शांततेचं वस्त्र उलगडत होतं.

      शेतात पाय ठेवल्यावर मातीचा राप माझ्या पायांना चिकटला, जणू म्हणत होता “तू कुठेही जा, पण माझ्यापासून दूर नाही.”
कडधान्याच्या शेतात मंद वारा डोलत होता. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाज येत होता.
मी नांगराच्या मागे चालणाऱ्या काकांच्या गप्पा ऐकत काही काळ शांत उभा राहिलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताना म्हटलं,
“शहरातलं आयुष्य मोठं झालं रे, पण सुख अजून ह्या मातीच्या ओलितचं आहे.”
त्या वाक्यानं मनात कुठेतरी दरवाजा दणकन उघडला.

        शेतातून परतताना अचानक मनात आलं—“चल, डोंगरावर जाऊया…”
बालपणी ज्या डोंगरावर मी, माझी मित्र धावतफिरत, गोट्या खेळत भटकत असायचो, त्याच डोंगराचं शिखर आज पुन्हा मला बोलवत होतं.

         मी तिथपर्यंत पायीच निघालो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच वेगळीच हवा सुरू झाली थंड, स्वच्छ आणि सुगंधी. प्रत्येक पायरीवर मला माझं जुनं रूप भेटत होतं.
ज्या झाडामागे लपून आम्ही “लपाछपी” खेळायचो ते अजूनही तिथे उभेच आहेत.
एकेक खडक, एकेक दगड जणू माझी वाट पाहत होते.

        शिखरावर पोहोचलो तेव्हा खाली सगळं गाव दिसत होतं, शेतं, ओढा, मंदिरे, लाल कौलांची घरं…
वाऱ्याच्या एका जोरदार झुळुकेत मनाला स्पष्ट जाणवलं “जीवन किती धावतंय, आणि आपण किती विसरत चाललोय…”
त्या उंचीवर काही क्षण स्वतःशीच बसून राहणं म्हणजे एक प्रकारची साधना होती.

      रात्री अंगणात खाट टाकून मी झोपायला गेलो.
आकाश भरलं होतं ताऱ्यांनी.
वाऱ्याचा मंद आवाज, आसपासचा अंधार, आणि त्या शांततेत येणाऱ्या मातीच्या गंधाने मनात एकच विचार पक्का झाला.
“या मातीशी नातं तुटत नाही… काहीही झालं तरी नाही.”

       त्या रात्री झोपताना मला जाणवलं, गावाकडा जाणं म्हणजे बाहेरचा प्रवास नव्हे, तो आतल्या प्रवासाचा आरंभ असतो.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा

- विलास खैरनार 

इंदुरीकर महाराज लोकप्रिय झाले ते त्यांच्या नवीन पद्धतीच्या कीर्तनशैलीमुळे. त्यांच्या अगोदरही अनेक कीर्तनकार झाले, पण अशा विनोदी भरलेल्या, जोरदार अभिनयाने सजलेल्या, कधी-कधी टोकाच्या टीकेने रंगलेल्या शैलीत कोणी बोलले नव्हते. ‘कॉमेडी कीर्तन’ हा शब्द कानावर पडायला लागला तो यांच्यामुळेच.पण त्यांच्या उपरोधिक टिप्पणींच्या धडाक्यात स्त्रियांविषयी अनेकदा कमीपणाची, हीन मानसिकतेची टीका ऐकू येत गेली, हेही तितकेच खरं. व्यसनाधीन युवकांवर त्यांनी झडर घातला, ते योग्यच; पण अनेक मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी मध्ययुगीनच वाटत असे. असो, विषय तो नाही. प्रश्न आहे त्यांच्या अलीकडील निर्णयाचा आणि त्यामागच्या दिलेल्या कारणाचा. अचानक ते म्हणाले "आता मी कीर्तन करणार नाही, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, कीर्तन करावं की करू नये. पण लोकांना मी घोडे लावलेत!" ही भाषा? आणि ही पद्धत कितपत योग्य?

वर्षानुवर्षे ते कीर्तनात सांगत आले, मुलींनी गॉगल लावू नये, मेकअप नको, वराती मध्ये नाच नको, खर्चिक लग्नं करू नयेत, गाडी-घोड्यांची मिरवणूक नको, मेनू साधा असावा, उधळपट्टी टाळा, लोक त्यावर टाळ्या पिटत, हसत, दाद देत.पण त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला मात्र, मोठा दिमाख, स्टाईलिश एंट्री, गॉगल, मेकअप, नाच, समारंभात भरपूर खर्च, आणि सगळे तेच "थेर" ज्यावर ते स्वतः वर्षानुवर्षे टीका करत आले. त्यांच्या मुलीला सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, हे साऱ्यांचंच मत आहे. पण तेच उपदेश करत राहणारे स्वतःला मात्र अपवाद समजून कसं चालणार?

ते सांगत होते की, वऱ्हाडी जमिनीवर बसले,वाढपी वारकरी पोशाखात, महिला पारंपरिक वेशात त्यांचे हे मुद्दे छानच आहेत पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले उपदेश त्यांनीच पाळले की नाही? त्यांनीच सांगितलं होतं “जेवण साधं असावं! एक लापशी, आमटी-भात पुरेसा!” पण त्यांच्या कार्यक्रमात? यादी पाहिली की त्यांचेच भाषण आठवतं. ज्यावर त्यांनी कडाडून टीका केली. 

लोकांवर उपदेश करणाऱ्यांचे आचरण अधिक कसोशीने तपासले जाते हेच इंदुरीकर महाराज विसरले. लोकांना चार गोष्टी सुनावणारा माणूस जेव्हा स्वतःच उलट वागतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. लोकांनी चूक दाखवली म्हणून त्यांच्यावर तेच नाराजी, त्रागा आणि "घोडे लावलेत!" अस बोलतात. ही भाषा आणि हा पवित्रा कीर्तनकारांना शोभणारा नाही. उपदेश करणारा स्वतः पाळत नसला तर त्याचा उपदेश तोंडाची वाफ ठरतो आणि हेच आज दिसलं. उपदेश एक आणि वर्तन दुसरे असेल तर तो दांभिकपणा ठरतो. संत परंपरेच्या नावाने बोलणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला नको का?

कीर्तन ही परंपरा म्हणजे फक्त विनोद, टिंगल, टाळ्या नव्हे, ती संस्कृती, प्रबोधन, विचार आणि नैतिकतेची साधना आहे.
“कीर्तन तेथेच, जिथे हिताचा संदेश असतो
आणि जिथे कीर्तन करावं तेथे अन्नाचा मोह नसावा" 
असे तुकाराम महाराज म्हणतात. ही मापदंडे आजचे सर्व कीर्तनकार पाळतात का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

इंदुरीकर महाराज जे काही होते आणि आजच्या परिस्थितीत तफावत दिसते म्हणूनच लोकांनी त्यांना आरसा दाखवला. हे स्वीकारणं कठीण जरी वाटलं तरी तेच योग्य आहे. प्रसिद्ध व्यक्ती कितीही मोठी असली तरी उपदेश करताना आणि आचरणात तफावत असेल तर समाज माफ करत नाही.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

साथ किसका?

हमें पत्थर मारने वालों में
वो भी साथ थे…!
जिनके गुनाह कभी हम
अपने सर लिया करते थे…!

कितनी अजीब होती है ये दुनिया,
चेहरे हँसते रहे पर दिलों में नक़्शे बदलते रहे।
हम समझते रहे जिन्हें अपना साया,
वो ही तिरछी धूप बनकर निकलते रहे।

हमने जिनके दर्द को अपनी चुपी में छुपाया,
वो ही आज हमारी आवाज़ का मज़ाक उड़ाते रहे।
जिनके लिये हम रातों को जागे,
वो ही सुबह हमें पत्थर दिखाते रहे।

लेकिन ज़िन्दगी का हिसाब बड़ा साफ़ होता है
कौन अपना, कौन पराया…
आख़िर वक्त ही बता देता है।

हम गिर भी जाएँ तो क्या?
हमारी रूह नहीं टूटने वाली
क्योंकि धोखा देने वाले बहुत मिले,
पर दिल से चाहने वाले
अब भी थोड़े सही, लेकीन सच्चे मिले.
                      - विलास खैरनार 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

तुझ्या लग्नाच्या दिवशी



तुझ्या लग्नाच्या दिवशी,
मी गावातच होतो
तु फुलांनी नटलेली होतीस,
अन् मी आठवणींत अडकलो होतो.

नाही आलो मी तुझ्या लग्नाच्या मंडपात,
पण मन मात्र तुझ्याच भवती फिरत होतं 
तुझ्या नजरें आड तुलाच बघतं होतं,

तुला हळद लागली तेव्हा  
तु सोन्यासारखी चमकत होती
पण त्या पिवळ्या रंगाखाली
दडलेली तुझी वेदना फक्त मलाच दिसत होती

नगाऱ्यांच्या आवाजात
माझं मन शांत झालं होतं 
सनईच्या सुरात
नाव माझं कुठे दिसतं नव्हतं.

हसत होते सर्व 
अन् तु शांतपणे रडत होती
डोळ्यांत येणारं पाणी 
तु हळुवार पुसत होती

सात फेरे घेताना, तुझा तोल गेला 
लोक म्हणाले " तु जरा घाबरलीस",
पण मला जाणवलं,
तू तेव्हा माझ्या आठवणीत अडकलीस

तेव्हाच....
तुझ्या पायातील पैजणांचा एक घुंगरू,
घसरत माझ्या पायांजवळ आला,
वाकून मी तो उचलला,
तेव्हा त्यावर दिसत होती
तुझ्या मेहंदीची हलकी छटा,
अन् सुगंध तुझ्या अंगाचा,
तुझ्या ओंजळीचा...

पण लगेच आठवलं,
तो तुझ्या नव्या आयुष्याचा होता...

मी तो शांतपणे मुठीत बंद केला 
अन् मागे सरकलो,
त्या नव्या वाटेवर
माझ्या प्रेमाला अर्पण करत होतो

आता मी जेव्हा जेव्हा गावात जातो,
अन् त्याच ठिकाणी उभा राहतो,
तुझ्या लग्नाचा तो दिवस
दरवर्षी पुन्हा पुन्हा आठवतो 
             - विलास खैरनार 

स्मशानभूमी

 

रात्रीचा गडद अंधार उतरला
आकाशातला चंद्रही थकला
एक थंड वाऱ्याची झुळूक आली
आणि माझा पाऊल स्मशानभूमीत पडला

जवळच एका कावळ्याने काव केला 
जणू तु मला सांगत होता 
"इथं सगळ्यांनी येऊन गप्प व्हायचं असतं,
आवाजही इथे अर्थ हरवतो..."

एका चितेचा धूर आकाशाला भिडला
त्यात कुणाचं आयुष्य धुरासारखं विरलं होतं 
जणू कुणाचं स्वप्नं जळत होतं
कुणाचं हास्य, कुणाचं बालपण
एकेक लाकडं जळताना मी बघत होतो

त्या राखेतून उठणाऱ्या वाऱ्याने
माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला
अन् मला जाणवलं 
मृत्यूही किती शांत असतो
जीवनाच्या कोलाहलापेक्षा अधिक जिवंत असतो

स्मशानभूमी 
ही फक्त शेवटाची जागा नाही
ही सुरुवातीची जाणीव आहे
माणसाची शेवटी फक्त मातीच आहे

जिथे श्रीमंत-गरीब एकाच जागेवर येतात
जिथे अहंकार, पैसा, कीर्ती 
सगळं एकाच राखेत मिसळतात

त्या राखेखाली कित्येक कथा आहेत
कुणाचं अपूर्ण प्रेम
कुणाचं मोडलेलं आयुष्य
कुणाचं न सांगितलेलं सत्य

कधी कधी एखादा वाऱा वाहतो
तो जणू त्यांचाच श्वास असतो
जे अजून काही सांगू इच्छितात 
पण त्यांची भाषा आता राख झाली आहे

मी त्या रात्री बऱ्याच वेळ बसलो
त्या शांततेत
त्या राखेच्या सुगंधात
त्या मृत्यूसारख्या जिवंत क्षणात

आणि मला जाणवलं 
स्मशानभूमी भयाण नाही
ते सत्य आहे…
जीवंत माणसांसाठी 
ठेवलेला तो एक आरसा आहे

जिथे प्रत्येकाला दिसतं 
की आयुष्य किती क्षणभंगुर आहे
अन् प्रेमच एकमेव शाश्वत आहे

त्या राखेतून उठणाऱ्या धुरासारखं
मीही एक दिवस विरून जाणार
पण कदाचित कुणाच्या आठवणीत
थोडा जिवंत राहीन
जसं स्मशानभूमीत
धुरानंतरही उरतो तो वास 
शांततेचा, शेवटाचा, आणि सुरुवातीचा
                        - विलास खैरनार