शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

कर्णाचा प्रश्न

कृष्णा...!
तू देव? 
की रणाचा नट?
तू बोललास धर्म, 
पण चाललास कपट!
माझ्या रथाचं चाक चिखलात अडलं,
अन् तू हसलास  
"मार अर्जुना, वेळ आली!" 
असं म्हणालास...

हेच का तुझं धर्मयुद्ध, 
हेच का तुझं गीतेचं तत्त्व?
कमकुवत क्षणी प्रहार, 
हीच का तुझी नीती वचने?
मी धनुष्य खाली ठेवला 
अन् तू माझा जीव घेतला 

मी दानशूर होतो, 
पण नशिबानं फुटका होतो,
जातीनं सुतपुत्र, 
म्हणून मी हरलो का?
देवाचा मित्र असूनही, 
देवानेच मला फसवलं,

कृष्णा...!
अजूनही मनात एकच प्रश्न आहे 
हे तुझं देवत्व होतं 
की राजकारण होतं?
             - विलास खैरनार

जीवाभावाचा मित्र

माझा मित्र
जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो 

प्रत्येक संध्याकाळ येते 
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी

डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं

मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत

त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली 

तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी

कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण, 
जिवंत कविता
           - विलास खैरनार 

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानोबा

ज्ञानोबा...
तु शब्दांचा महासागर असतांना 
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.

तु लिहीत गेलास गीतेतील ओवी, 
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी

वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,  
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास 
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."  
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला 
फक्त भावनांची बोली उरली,  
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.

तु सांगशील का, ज्ञानोबा,  
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?  
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?

तुच शिकवलंस  
भक्ती म्हणजे प्रेम,  
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,  

कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी, 
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
                                         - विलास खैरनार 

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक

- विलास खैरनार 

भारतीय संविधान लिहून झाले तेव्हा देशाचा व भवितव्याच्या डोळ्यांत आशेचा तेजोमय प्रकाश होता. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार मशाली हातात घेऊन नव्या राष्ट्रानं प्रवास सुरू केला.
पण आज प्रश्न असा आहे, आपण त्या मशाली पेटवून ठेवतोय की त्यांच्या सावलीत अंधारच वाढवत आहोत?
संविधान म्हणतं “सर्वांना समान अधिकार” पण जमिनीवर अजूनही माणूस जातीवर मोजला जातो, धर्मावर तोलला जातो, पैशावर विकला जातो.
हा कोणता न्याय? हा कोणता विकास?

आजही एखादी मुलगी शिक्षणासाठी लढते, एखादा तरुण नोकरीसाठी धावतो, गरीब न्यायासाठी भटकतो…
आणि वरचे लोक संविधानाचे तख्त धारण करून फक्त भाषणं देत राहतात. संविधान समानता शिकवतं, समाज मात्र अजूनही भेदभावाच्या घाणेरड्या जाळ्यात गुदमरतो.
संविधानानं आवाज दिला, पण आज आवाज उठला की त्याला “देशद्रोही” असा शिक्का मिळतो. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या मागे नोटिसा धावतात. विद्यार्थी बोलले तर त्यांना आंदोलनात गुन्हेगार बनवलं जातं.
लेखक-कलावंत यांनी मत मांडले की त्यांच्यावर सोशल मीडिया तलवारी उगारतो. स्वातंत्र्य देणारं संविधान जिवंत आहे, पण आवाज दाबण्याची प्रवृत्ती त्याच्यावर धूळ टाकत आहे.

भारताचा आत्मा विविधतेत आहे. पण आज धर्मांच्या नावावर द्वेष पेरला जातो, भीती विकली जाते, आणि श्रद्धेच्या आडून सत्तेचा व्यापार केला जातो. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं शील आहे, पण आज तिचं अपहरण करून तिला राजकीय सभांमध्ये ढोल - ताशे फिरवले जातात.
धर्म जितका मोठा केला तितका माणूस लहान होत जातो आणि हाच विद्रोहाचा क्षण आहे. संविधानानं सत्ता मर्यादित ठेवली. पण आज सत्तेला मर्यादा नाहीत,
उलट लोकशाहीला मर्यादा लावल्या जातात. सत्तेत बसलेले लोक टीका ऐकू इच्छित नाहीत, विरोधकांना शत्रू मानतात, आणि प्रशासनाला स्वतःच्या हातातली बाहुली बनवतात. न्यायालय, माध्यम, संसद ज्या संस्थांनी लोकशाही सांभाळायची, त्यांना कमकुवत करण्याची स्पर्धा दिसते. संविधान संस्था मजबूत करायला सांगतं; सत्ता मात्र संस्थांना वाकवायला धडपडते. पण हा देश फक्त शासकांच्या हातात नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या विवेकात आहे. तरीही आपणच लोकशाहीला जखमा देतो,
धोका कुणाकडूनच नव्हे, कधी कधी आपल्या शांततेतूनही वाढतो.

संविधान अजूनही शक्तिशाली आहे, पण त्याची अंमलबजावणी कमजोर. समाजात वाढणारा अन्याय,
राजकारणात वाढणारी दुटप्पीपणा, सत्तेच्या अहंकारात हरवलेली जबाबदारी, लोकांच्या विचारांवर वाढणारे ध्रुवीकरण हे सगळं या महान दस्तावेजाच्या पायावर घाव घालणारं आहे. विद्रोह म्हणजे हिंसा नाही, विद्रोह म्हणजे प्रश्न विचारणं, अन्यायाला “नाही” म्हणणं, संविधानातल्या मूल्यांना पुन्हा प्रज्वलित करणं. कारण शेवटी, संविधान जिवंत तेव्हाच राहील, जेव्हा आपण जागृत राहू.



सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार