Monday, August 17, 2026

तुझ्यातच सापडतेस तू

तिने हळूच विचारलं,
“तू माझ्याव्यतिरिक्त
कधी कोणाच्या प्रेमात पडलास का?”

मी काहीच बोललो नाही…
फक्त तिच्याकडे पाहिलं,
नजरेला तिची नजर भिडली,
आणि ओठांवर अलगद हसू उमटलं.

मी म्हणालो,
“हो… पडलोय.”

क्षणभर ती कावरीबावरी झाली,
तिच्या डोळ्यांत प्रश्न उमटले,
ओठांवरची हसरी रेषा विरली…
आणि ती शांत झाली.

मी हळूच म्हणालो
“मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय…

कारण प्रत्येक पुस्तक उघडलं की,
त्यातली एखादी कथा
मला तुझीच आठवण करून देते.

प्रत्येक पात्रात
तुझं एखादं रूप दिसतं,
प्रत्येक शब्दामध्ये
तुझा आवाज ऐकू येतो…

आणि प्रत्येक कथा संपताना
एकच जाणवतं

मी पुस्तकांच्या प्रेमात पडलो असलो,
तरी त्या प्रत्येक कथेत
मी शोधत असतो…
तुलाच आणि फक्त तुलाच”

©️ विलास खैरनार 

Tuesday, July 28, 2026

गाव हरवत चाललंय... की माणूस?

- विलास खैरनार 

"गाव बदललंय" हे वाक्य आजकाल खूप सहज ऐकायला मिळतं. पण खरंच गाव बदललंय का? की गावाला गावपण देणारा माणूसच हरवत चाललाय?

पूर्वी गावात रस्ते कमी होते, पण माणसांमधले रस्ते खुले होते. आज डांबरी रस्ते झाले, पण मनांमधल्या वाटा कायमच्या बंद झाल्या. प्रत्येक घरावर सिमेंटचं छप्पर आलं, पण नात्यांवर मात्र स्वार्थाचं छप्पर चढलं.

आधुनिकतेच्या नावाखाली आपण विकासाच्या घोषणा करतो. उंच इमारती, चौपदरी रस्ते, इंटरनेट, मॉल, स्मार्टफोन यालाच विकास मानलं जातं. पण गावातल्या ओस पडलेल्या चावडीचा, शांत झालेल्या मंदिराच्या पाराचा, रिकाम्या विहिरीचा आणि बंद पडलेल्या शाळेचा हिशोब कोण मांडणार?

एकेकाळी गावात कुणा एकाच दुःख हे सगळ्या गावाचं दुःख असायचं. आज शेजाऱ्याचं नाव माहीत नसलेले लोक "सोशल" झालेत. मोबाईलमध्ये हजारो मित्र आहेत, पण संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा एकही माणूस नाही.

गावातून तरुण शहराकडे गेला, हे त्याचं स्वप्न होतं. पण त्याच्यासोबत गावाची उमेद, शेताची ताकद आणि संस्कृतीची मुळंही शहरात निघून गेली. मागे उरले वृद्ध आई-वडील, कुलूपबंद घरे आणि आठवणींवर जगणाऱ्या भिंती.

हा विकास आहे की विस्थापन?
ज्या मातीत जन्मलो, त्याच मातीत जगणं आज कमीपणाचं का वाटू लागलं? शेतात राबणारा बाप मागास समजला जातो आणि वातानुकूलित कार्यालयात बसणारा मुलगा यशस्वी ठरतो. श्रमाची किंमत कमी झाली आणि दिखाव्याची किंमत वाढली.

गावात आता सण होतात, पण उत्सव हरवलेत. जत्रा भरतात, पण मनं भेटत नाहीत. घरं मोठी झाली, पण कुटुंबं लहान झाली. पैसा वाढला, पण समाधान कमी झालं. आधुनिकतेने सुविधा दिल्या; पण माणुसकी हिरावून घेतली.

प्रश्न आधुनिकतेचा नाही. प्रश्न असा आहे की विकासाच्या नावाखाली आपण माणूसपण गहाण का ठेवलं? प्रगतीची व्याख्या जर फक्त सिमेंट, स्टील आणि मोबाईल नेटवर्कमध्ये अडकली, तर उद्या इतिहास लिहीला जाईल, गाव वाचलं होतं, पण गावपण मेलेलं होतं.

आज गरज आहे ती नव्या रस्त्यांची नाही; तर तुटलेल्या नात्यांना जोडणाऱ्या वाटांची. नव्या इमारतींची नाही; तर जुन्या विश्वासाची. नव्या यंत्रांची नाही; तर माणसाच्या मनात पुन्हा माणूस जागवण्याची.

कारण गाव कधीच घरांचा समूह नसून. गाव म्हणजे माणुसकीचा श्वास असतो. आणि जर तोच श्वास गुदमरला, तर गाव हरवत जाईल आणि माणूस सुद्धा.

Thursday, July 16, 2026

लोकशाहीचा गळा घोटणारी शांतता

 - विलास खैरनार 

जंतर-मंतरवर एक माणूस उपोषणाला बसतो. तो दगडफेक करत नाही, सरकारी मालमत्ता जाळत नाही, हिंसेचे आवाहन करत नाही. तो फक्त आपल्या मागण्या ऐकल्या जाव्यात म्हणून लोकशाहीने दिलेल्या घटनात्मक मार्गाचा अवलंब करतो. पण त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाते. ही केवळ एका व्यक्तीची उपेक्षा नाही; हा लोकशाहीच्या आत्म्यालाच दिलेला धक्का आहे. देशात एखादा सामान्य नागरिक अन्यायाविरोधात बोलला तर त्याला "देशविरोधी", "राजकारण करणारा" किंवा "प्रसिद्धी मिळवणारा" असा शिक्कामोर्तब होतो. पण सरकारचे काम शिक्का मारणे नसून प्रश्न ऐकणे आणि त्यावर उत्तरदायीपणे कृती करणे आहे.

जंतर-मंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व देशासाठी काम करणारे, पर्यावरण, हिमालय आणि स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे म्हणून ओळखले जाते. अशा व्यक्तीच्या मागण्या मान्य करायच्या की नाही हा वेगळा विषय असू शकतो; पण त्या ऐकून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. लोकशाहीमध्ये संवाद हा दडपशाहीपेक्षा नेहमीच मोठा असतो. आज देशात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. परीक्षांचे पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करतात, आई-वडील कर्ज काढून मुलांना शिकवतात, अनेक जण नोकरीची आशा ठेवून वर्षानुवर्षे तयारी करतात. आणि शेवटी जर काही पैशांच्या जोरावर पेपर आधीच विकले जात असतील, तर ही केवळ परीक्षा व्यवस्था कोलमडल्याची बाब नाही; हा मेहनतीचा खून आहे.

प्रश्न असा आहे की, या गैरप्रकारांची जबाबदारी कोणाची सरकार व्यवस्था चालवत असेल, तर उत्तरदायित्वही सरकारचेच असते. पेपरफुटी रोखण्यासाठी कोणती ठोस यंत्रणा उभी केली? दोषींवर कितपत कठोर कारवाई झाली? पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या घटना का घडतात? हे प्रश्न विचारणे म्हणजे देशविरोध नव्हे; तर लोकशाहीतील नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. लोकशाही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते. निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न ऐकणे, संवाद साधणे, टीका स्वीकारणे आणि चुका सुधारण्याची तयारी ठेवणे हेच सुशासनाचे लक्षण असते. सत्ता ही जनतेने दिलेली जबाबदारी आहे, परवाना नाही.

आज परिस्थिती अशी झाली आहे की, शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाही संशयाने पाहिले जाते. प्रश्न विचारणारा शत्रू वाटू लागतो आणि मौन बाळगणाऱ्यांनाच देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आणि लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे कोणतेही तंत्र टिकाऊ नसते. इतिहास सांगतो की, लोकांचा संयम संपला की परिवर्तनाची सुरुवात होते. जनतेचा आवाज काही काळ दाबता येतो; कायमचा नाही.

आज गरज आहे ती घोषणांची नाही, तर उत्तरदायित्वाची. आश्वासनांची नाही, तर कृतीची. जनतेला भाषणांपेक्षा न्याय हवा आहे. तरुणांना प्रचार नव्हे, तर पारदर्शक परीक्षा व्यवस्था हवी आहे. आंदोलकांना दडपशाही नव्हे, तर संवाद हवा आहे. सरकार कोणतेही असो, लोकशाहीची खरी ताकद विरोधी मत ऐकण्यात असते. कारण सत्तेचा अहंकार क्षणिक असतो; पण जनतेचा इतिहास कायमचा असतो. जर एखादा शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक आपल्या हक्कांसाठी उपोषणाला बसत असेल, तर त्याचा आवाज ऐकणे ही लोकशाहीची किमान अपेक्षा आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प बसवून व्यवस्था मजबूत होत नाही; उलट जनतेचा विश्वास कमकुवत होतो.

शेवटी एकच प्रश्न उरतो, देश चालवायचा आहे की फक्त सत्ता? लोकशाही वाचवायची आहे की फक्त प्रतिमा?
कारण जनता शांत असली तरी ती आंधळी नसते. आणि इतिहास नेहमी सत्तेचे नव्हे, सत्याचे साक्षीदार लिहितो.

Wednesday, July 8, 2026

विकासाच्या घोषणा आणि वास्तवातील खड्डे

- विलास खैरनार

"रस्त्यावरचे खड्डे फक्त डांबराचे नसतात; ते व्यवस्थेच्या विवेकावर पडलेले खोल जखमेचे व्रण असतात."
दर पाच वर्षांनी देशात विकासाच्या घोषणा नव्याने जन्म घेतात. सभांमध्ये मंच दणाणून जातात. माईकवरून घुमणारे शब्द कानाला गोड वाटतात "विकास झाला आहे, विकास होणार आहे, जगात सर्वात वेगाने धावणारा देश" अशा घोषणा ऐकताना क्षणभर वाटतं, आपण खरंच प्रगतीच्या महामार्गावर धावत आहोत.
पण भाषण संपल्यावर, टाळ्यांचा गजर थांबतो आणि नागरिक पुन्हा आपल्या रोजच्या रस्त्यावर उतरतो. तेव्हा त्याला भेटतो तो विकासाचा नव्हे, तर खड्ड्यांचा महामार्ग.
हे खड्डे केवळ रस्त्यावर नसतात. ते शिक्षणात असतात. आरोग्य व्यवस्थेत असतात. शेतीत असतात. रोजगारात असतात. प्रशासनात असतात. आणि सर्वात मोठा खड्डा असतो जनतेच्या विश्वासात.

आज प्रत्येक निवडणुकीत विकास हा सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे. पण त्या शब्दाचा अर्थ कोणाला विचारला, तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. कोणासाठी उंच पूल म्हणजे विकास, कोणासाठी मोठमोठ्या इमारती, कोणासाठी मेट्रो, कोणासाठी डिजिटल सेवा. पण ज्याच्या घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, त्याच्यासाठी विकास म्हणजे पोटभर भाकरी. शेतकऱ्यासाठी विकास म्हणजे पिकाला योग्य भाव. विद्यार्थ्यासाठी विकास म्हणजे दर्जेदार शिक्षण. बेरोजगार तरुणासाठी विकास म्हणजे नोकरी. रुग्णासाठी विकास म्हणजे वेळेवर उपचार. पण आपण विकासाची व्याख्या माणसाऐवजी काँक्रीटमध्ये शोधू लागलो आहोत. नवीन रस्त्याचं भूमिपूजन होतं. मोठमोठे फलक लावले जातात. नारळ फुटतो. फोटो काढले जातात. बातम्या झळकतात. पण पहिला पाऊस पडतो आणि रस्ता पुन्हा उघड्या जखमेसारखा फाटतो. मग प्रशासन सांगतं "अतिवृष्टी झाली." कंत्राटदार म्हणतो "काम नियमानुसार झालं." लोकप्रतिनिधी म्हणतो "चौकशी करू." आणि जनता पुन्हा त्याच खड्ड्यातून वाट काढते.

प्रश्न असा आहे की पावसाने रस्ता वाहून जातो, ही कोणाची जबाबदारी? दरवर्षी अपघात होतात. कित्येक निष्पाप लोक जीव गमावतात. एखाद्या कुटुंबाचा आधारवड हरवतो. एखादं मूल अनाथ होतं. पण त्या मृत्यूंची जबाबदारी कोण स्वीकारतं? खड्ड्यांवर फुलं वाहणारे बरेच असतात; खड्डे कायमचे बुजवणारे फार कमी.

विकासाच्या नावाने हजारो कोटींच्या योजना जाहीर होतात. उद्घाटने होतात. जाहिराती झळकतात. पण गावाच्या शेवटच्या वस्तीपर्यंत अजूनही पिण्याचं पाणी पोहोचलेलं नसतं. शाळेत शिक्षक अपुरे असतात. दवाखान्यात डॉक्टर नसतात. शेतात वीज नसते. रोजगाराच्या शोधात तरुण गाव सोडून शहराकडे निघून जातो. मग विकास नेमका कोणाच्या दारात पोहोचतो?

आज राजकारणात घोषणांची स्पर्धा आहे; कामांची नाही. प्रत्येक जाहीर सभा नव्या आश्वासनांनी भरलेली असते. पण जुन्या आश्वासनांचं काय झालं, हा प्रश्न विचारणाऱ्यांना अनेकदा गप्प बसवलं जातं. कारण घोषणांना स्मृती नसते, पण ती जनतेला असायला हवी.

विकासाचा खरा अर्थ म्हणजे माणसाचं जीवन सन्मानाने जगण्यालायक करणं. जर एखाद्या गावात अजूनही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसेल, विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षणासाठी गाव सोडावं लागत असेल, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत असेल आणि बेरोजगार तरुण अर्जांच्या रांगेत आयुष्य घालवत असेल, तर केवळ उंच इमारती विकासाचा पुरावा ठरत नाहीत.

आज आपण रस्त्यावरील खड्डे मोजतो, पण व्यवस्थेतील खड्डे मोजत नाही. कारण व्यवस्थेतील खड्डे दिसत नाहीत; ते जाणवतात. ते एखाद्या शेतकऱ्याच्या अश्रूंमध्ये दिसतात. बेरोजगाराच्या रिकाम्या खिशात दिसतात. सरकारी दवाखान्याच्या लांब रांगेत दिसतात. विद्यार्थ्याच्या अपूर्ण स्वप्नात दिसतात.

लोकशाहीत जनता ही मालक असते, असं आपण म्हणतो. पण मालकाला आपल्या पैशाचा हिशेब विचारण्याची हिंमत उरली आहे का? कराच्या पैशातून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक रस्त्याचा, प्रत्येक पुलाचा, प्रत्येक योजनेचा दर्जा विचारणं हा अधिकारच नव्हे, तर लोकशाहीचं कर्तव्य आहे.

विकासाची जाहिरात जितकी मोठी होत चालली आहे, तितकाच वास्तवाचा आरसा धूसर होत आहे. कारण आज प्रतिमेवर खर्च जास्त होतो, गुणवत्तेवर कमी. प्रसिद्धीचा फलक मजबूत असतो; पण त्यामागचा रस्ता कमकुवत असतो.

विकास हा भाषणाचा विषय नसून जबाबदारीचा विषय आहे. तो घोषणांच्या आवाजात नव्हे, तर नागरिकांच्या समाधानात दिसला पाहिजे. एखादा नागरिक रात्री निर्धास्तपणे रस्त्यावरून घरी पोहोचला, शेतकऱ्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळाला, विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली, रुग्णाला उपचार मिळाले आणि तरुणाला रोजगार मिळाला, तेव्हाच विकासाची घोषणा खरी ठरेल.

अन्यथा प्रत्येक निवडणुकीत घोषणा बदलतील, चेहरे बदलतील, फलक बदलतील; पण रस्त्यांवरील खड्डे आणि जनतेच्या आयुष्यातील खड्डे तसेच राहतील. आणि इतिहास एक दिवस एवढंच लिहील "घोषणांनी आकाश भरलं होतं; पण जमिनीवर चालताना प्रत्येक पावलाला खड्डाच भेटत होता.

Monday, June 29, 2026

न सुटलेलं गणित

- विलास खैरनार 

आज पुन्हा तोच दिवस उगवला होता. गणू सकाळपासून अस्वस्थ होता. घराच्या अंगणातल्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली बसून तो समोरच्या रस्त्याकडे पाहत होता. त्या रस्त्यानेच तो अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून शहराकडे गेला होता. आज त्या दिवसाला बरोबर दहा वर्षे झाली होती.
हातातल्या चहाचा कप थंड झाला होता, पण त्याच्या मनातल्या आठवणी मात्र अजूनही धगधगत होत्या.
सुरेखा...
हे नाव मनात आलं की अजूनही छातीत एक कळ उठायची.
दोघं लहानपणापासून एकत्र वाढले. नदीकाठची वाळू, शेतातल्या पायवाटा, जत्रा, मंदिराच्या पायऱ्या... प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आठवणी विखुरलेल्या होत्या. प्रेम कधी झालं, हे दोघांनाही कळलं नव्हतं.
एके संध्याकाळी सुरेखा म्हणाली, "गणू, तू खूप हुशार आहेस. या गावात राहिलास तर आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात राबशील. मला तुला मोठं होताना पाहायचं आहे."
गणू हसला आणि म्हणाला "आणि तू?"
"मी वाट पाहीन." सुरेखा म्हणाली 
त्या एका वाक्यावर विश्वास ठेवून गणूने आई-वडील, गाव, मित्र सगळं मागे सोडलं. शहरात गेला. दिवसा काम आणि रात्री शिक्षण. कितीतरी रात्री उपाशी झोपला. अनेक अपमान सहन केले. पण प्रत्येक वेळी त्याला सुरेखाचे शब्द आठवायचे "मला तुला मोठं होताना पाहायचं आहे."
चार वर्षांनी त्याला चांगली नोकरी मिळाली.
पहिला पगार हातात आला आणि त्याने सर्वात आधी सुरेखासाठी हिरव्या रंगाची साडी घेतली. गावाकडे परतताना त्याच्या मनात हजारो स्वप्नं होती. पण गावात पोहोचल्यावर त्याला कळलं. सुरेखाचं लग्न होऊन दोन महिने झाले होते.
तो काहीच बोलला नाही. मंदिरामागे जाऊन बराच वेळ बसून राहिला. नंतर कळलं, घरच्या गरिबीमुळे, वडिलांच्या आजारपणामुळे आणि समाजाच्या दबावामुळे तिने लग्नाला होकार दिला होता. 
तिने एक पत्र लिहिलं होतं.
"गणू, तुझ्या स्वप्नाच्या आड मला यायचं नव्हतं. म्हणून तुला काहीच सांगितलं नाही. तू परत येशील, तुझी स्वप्नं अर्धवट सोडशील, ही भीती होती. मला माफ कर."
ते पत्र गणूपर्यंत कधीच पोहोचलं नव्हतं. आज दहा वर्षांनी तेच पत्र त्याच्या हातात होतं. जुनं, पिवळं पडलेलं.
तो पुन्हा पुन्हा तेच शब्द वाचत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच पुटपुटला,
"मी गाव सोडलं, तिच्या स्वप्नासाठी.
ती मला सोडून गेली, माझ्या स्वप्नासाठी. 
मग नेमकं स्वप्न कोणाचं होतं? 
आणि सोडून कोण गेलं?" 
उत्तर आजही सापडलं नव्हतं.
कदाचित दोघांनीही एकमेकांना सोडलं नव्हतं. परिस्थितीने दोघांनाही वेगवेगळ्या वाटांवर उभं केलं होतं.
गणूने आकाशाकडे पाहिलं.
संध्याकाळचा सूर्य मावळत होता.
त्याला जाणवलं काही गणितं आयुष्यभर सुटत नाहीत. ती फक्त मनाच्या वहीत कायमची अपूर्ण राहतात. आणि त्या अपूर्ण उत्तरांनाच लोक "आठवण" म्हणतात.

Sunday, June 28, 2026

टीईटी पेपरफुटी : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून आणि व्यवस्थेचा काळा चेहरा

- विलास खैरनार 

"अभ्यास करा, मेहनत करा, यश तुमच्याच पायाशी येईल," असे सांगणारी व्यवस्था जेव्हा स्वतःच पैशाच्या बदल्यात प्रश्नपत्रिका विकते, तेव्हा मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून होतो. टीईटी पेपरफुटी ही केवळ एका परीक्षेतील गैरव्यवहार नाही; ती शिक्षणव्यवस्था, प्रशासन आणि लोकशाही मूल्यांवर झालेली गंभीर जखम आहे.

एका विद्यार्थ्याने वर्षानुवर्षे अभ्यास केला. कुटुंबाने कष्ट करून पुस्तके आणली, क्लासची फी भरली, उपाशी राहून मुलाला शिकवले. आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहिली. पण परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका काही मोजक्या लोकांच्या हातात पोहोचली. मग त्या विद्यार्थ्याच्या कष्टाचे मोल काय? त्याच्या प्रामाणिकपणाची किंमत काय?

पेपरफुटीचा सर्वात मोठा फटका गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो. त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होतो. "मेहनतीपेक्षा पैसे आणि ओळखी महत्त्वाच्या आहेत का?" हा प्रश्न त्यांच्या मनात कायमचा घर करून बसतो. हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे.

अशा घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तपास वेगाने पूर्ण झाला पाहिजे, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित केली पाहिजे. अन्यथा विद्यार्थ्यांचा न्यायव्यवस्थेवरील आणि शासनावरील विश्वास आणखी कमी होईल.

टीईटी पेपरफुटी ही केवळ एका परीक्षेची घटना नाही; ती लाखो कुटुंबांच्या आशा-आकांक्षांवर झालेला आघात आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचा, पालकांच्या त्यागाचा आणि समाजाच्या विश्वासाचा व्यापार करणाऱ्यांना कायद्यापुढे उत्तर द्यावेच लागेल. कारण स्वप्ने विकणाऱ्या व्यवस्थेपेक्षा स्वप्नांसाठी लढणारा समाज अधिक शक्तिशाली असतो.

आज वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची. जाब मागण्याची. कारण विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्याही भ्रष्टाचाराची किंमत ठरू शकत नाही.

Friday, June 26, 2026

गावाकडचा पाऊस

- विलास खैरनार 

पावसाळा हा केवळ एक ऋतू नाही; तो गावाकडच्या माणसाच्या आयुष्याचा श्वास आहे. शहरात पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, चिखल आणि छत्र्यांची गर्दी. पण गावात पाऊस म्हणजे नवजीवन, नव्या आशा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जुळून आलेलं नातं. प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पावसाबद्दल एक वेगळी ओढ असते. माझ्याही मनात गावाकडच्या पावसाच्या असंख्य आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.

पावसाळ्याची चाहूल लागते ती वैशाख- ज्येष्ठाच्या कडक उन्हानंतर. धरती तापलेली असते, झाडांची पानं करपलेली असतात आणि माणसाबरोबरच पक्षी, प्राणीही पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मग एक दिवस अचानक आकाशात काळेभोर ढग जमू लागतात. दूरवर विजा चमकतात, गडगडाट होतो आणि थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगावर येते. त्या वाऱ्याबरोबर मातीचा सुगंध दरवळू लागतो. तो सुगंध इतका मोहक असतो की मन नकळत शेताकडे धाव घेतं.

पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर बरसू लागल्या की संपूर्ण परिसर जणू नव्याने जन्म घेतो. कोरडी पडलेली जमीन हिरवीगार होऊ लागते. डोंगरांवर हिरव्या गवताची चादर पसरते. झाडांच्या फांद्यांवर नवी पालवी फुटते. शिवारात सर्वत्र चैतन्य निर्माण होतं. शेतात उभं राहून पावसाच्या त्या थंडगार सरी अंगावर झेलण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. कधी-कधी वाटायचं, या ओल्या मातीवर शांतपणे पडून राहावं, डोळे मिटावेत आणि निसर्गाचं संगीत ऐकत राहावं.

त्या शांततेत दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानावर पडायचा. झाडांवर बसलेले पक्षी आनंदाने किलबिल करायचे. शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ नाद घुमायचा. पेरणीसुरू झालेली असायची. शेतकरी पावसात भिजत आपल्या कामात मग्न असायचे. कुणी नांगर चालवत असे, कुणी वखर फिरवत असे, तर कुणी बियाण्याची तयारी करत असे. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत समाधान आणि आशा दिसायची. कारण हा पाऊसच त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो.

पाऊस थोडा थांबला की आमच्या मुलांच्या खेळांना सुरुवात व्हायची. आम्ही मित्रमंडळी गावाबाहेरच्या डोंगराकडे धावत सुटायचो. कोणत्या डोंगरावरून किती पाणी वाहत आहे, कोणत्या नाल्याला किती पाणी आलं आहे, कोणता ओढा भरून वाहतो आहे, हे पाहण्यातच आमचा आनंद असायचा. छोट्या-छोट्या धबधब्यांखाली उभं राहून भिजणं, पाण्यात उड्या मारणं, चिखलात खेळणं हे आमच्यासाठी मोठं साहस असायचं.

हे सगळं पाहून आम्ही आनंदाने गावात परतायचो आणि प्रत्येकाला सांगायचो, "अरे, अमक्या नाल्याला भरपूर पाणी आलंय!", "डोंगरावरून मोठा धबधबा वाहतोय!" आमच्या त्या बातम्या ऐकून गावातील मोठी माणसंही आनंदी व्हायची. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता; पण प्रत्येक आनंद प्रत्यक्ष भेटून वाटला जायचा.

गावाकडच्या पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाचा अंदाज. आज हवामान खात्याचे अहवाल, मोबाईल अॅप्स आणि उपग्रह आहेत. पण पूर्वी गावातील अनुभवी ज्येष्ठ माणसं निसर्गाची भाषा ओळखायची. संध्याकाळी गावातील मंदिराच्या ओट्यावर काही वयोवृद्ध मंडळी बसायची. त्यांची नजर सतत आकाशात फिरत असायची. ढगांचा रंग, त्यांची दिशा, वाऱ्याचा वेग, पक्ष्यांची हालचाल, वातावरणातील बदल या सगळ्यांचा अभ्यास करून ते सांगायचे, "आज रात्री पाऊस येईल", "हा ढग पुढे जाईल", "यंदा पाऊस चांगला पडेल" किंवा "अजून दोन दिवस थांबावं लागेल."

त्यांच्या अंदाजाचं आश्चर्य वाटायचं. अनेकदा त्यांचा अंदाज अक्षरशः खरा ठरायचा. मीही त्यांच्या जवळ जाऊन बसायचो. एकदा मी त्यांना विचारलं, "तुम्हाला एवढं सगळं कसं कळतं?" ते हसले आणि म्हणाले, "हे पुस्तकात शिकायचं नसतं रे. वर्षानुवर्षे निसर्ग पाहिला की तो स्वतः शिकवतो." मग त्यांनी रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र, वाऱ्याच्या दिशा आणि ढगांच्या हालचालींबद्दल सांगायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांचं बोलणं मला फारसं समजलं नाही; पण आज कळतं की तो त्यांच्या अनुभवाचा आणि निसर्ग निरीक्षणाचा खजिना होता.

पाऊस पडल्यावर लगेच शेतात पेरणी केली जात नसे. दोन-तीन दिवस जमिनीला पाणी मुरू दिलं जायचं. मग उन्हाची एक हलकी झाक पडली की जमिनीतून वाफ यायला लागायची. शेतकरी म्हणायचे, "आता वाफ आली." हाच पेरणीसाठी योग्य काळ असायचा. मग संपूर्ण गावात लगबग सुरू व्हायची. कुणी बैल सजवत असे, कुणी बियाण्याची पोती तयार करत असे, तर कुणी शेतीची अवजारे तपासत असे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण शेतात काम करत असे. त्या दिवसांत गावातील प्रत्येक घर शेतीभोवतीच फिरत असे. पावसाळ्यात गावातील प्रत्येक सण, प्रत्येक आनंद अधिक खुलून दिसायचा. पावसात भिजून अंग थरथरत असताना आईच्या हातचा गरम चहा म्हणजे जणू स्वर्गीय आनंद वाटायचा.

आज काळ बदलला आहे. शेतीची साधनं बदलली, हवामानाचा अंदाज मोबाईलवर मिळतो, बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले, गावातही आधुनिकता पोहोचली. पण गावाकडच्या पावसाचं सौंदर्य मात्र अजूनही तसंच आहे. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध, हिरवागार शिवार, धुक्याने झाकलेले डोंगर, पाण्याने भरलेले ओढे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचं ते निरागस रूप हे कधीच बदलणार नाही.

आज शहरात राहत असलो तरी पावसाचा पहिला थेंब पडला की मन नकळत गावाकडे धाव घेतं. डोळ्यांसमोर पुन्हा तेच हिरवे डोंगर उभे राहतात, बैलांच्या घुंगरांचा नाद ऐकू येतो, कोकिळेचा आवाज कानात घुमतो आणि ओल्या मातीचा सुगंध मन भरून टाकतो. तेव्हा जाणवतं की गावाकडचा पाऊस हा फक्त पाऊस नसतो; तो आपल्या बालपणाच्या आठवणींचा, मातीतल्या नात्याचा आणि आयुष्यभर जपून ठेवावासा वाटणाऱ्या भावविश्वाचा अमूल्य ठेवा असतो.

Thursday, June 18, 2026

बंडखोरी हा लोकशाहीला लागलेला कलंक

- विलास खैरनार

महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही विचारांची, चळवळींची आणि लोकशाही मूल्यांची राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या राज्यात लोकशाहीचा पाया नेहमीच मजबूत मानला गेला. मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या पक्षफोडी, आमदार-खासदारांची बंडखोरी आणि सत्तेसाठी चाललेल्या खेळींमुळे लोकशाहीची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे.

आज महाराष्ट्राचे राजकीय वातावरण स्थिर नाही. एका पक्षातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जातात, पक्षातील मोठे गट फुटतात, सत्तेसाठी विचारसरणी बदलली जाते आणि जनतेने दिलेला कौल क्षणात बदलला जातो. या सर्व प्रक्रियेला "बंडखोरी" असे नाव दिले जाते; परंतु प्रत्यक्षात ही बंडखोरी नसून मतदारांच्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे.

लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. निवडणुकीत तो पक्षाच्या जाहीरनाम्यावर, विचारसरणीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मत देतो. परंतु निवडून आल्यानंतर काही लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पक्षांतर करतात किंवा पक्ष फोडतात. अशा वेळी जनतेने दिलेल्या मतांचा अपमान होतो. कारण मतदाराने ज्या पक्षाला निवडून दिले, त्याच पक्षाचा प्रतिनिधी दुसऱ्याच विचारांच्या गोटात जाऊन बसतो.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घटनांनी ही समस्या अधिक गंभीर केली आहे. सत्तेसाठी पक्षांत फूट पाडणे, आमदारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे, बहुमत सिद्ध करण्यासाठी आकडेमोड करणे आणि जनतेच्या प्रश्नांऐवजी सत्तेच्या गणितांमध्ये रमणे ही बाब चिंताजनक आहे. या सगळ्या प्रक्रियेत सर्वाधिक नुकसान जनतेचेच होते. कारण शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महागाई आणि विकासाचे प्रश्न मागे पडतात.

राजकारण्यांना वाटते की बंडखोरी म्हणजे नेतृत्वाविरुद्धचा संघर्ष; पण अनेकदा ती सत्तेच्या लालसेतून जन्माला आलेली असते. विचारसरणी, तत्त्वे आणि जनहित यापेक्षा मंत्रीपद, सत्ता आणि राजकीय अस्तित्व महत्त्वाचे ठरते. त्यामुळे लोकांच्या मनात राजकारणाविषयी अविश्वास निर्माण होतो. "आपण मत दिले तरी शेवटी हे आपल्याला विचारत नाहीत" अशी भावना मतदारांमध्ये वाढू लागते. ही भावना लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

लोकशाही केवळ निवडणुकांवर चालत नाही; ती विश्वासावर चालते. मतदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वास तुटला की लोकशाही कमकुवत होते. पक्षफोडी आणि बंडखोरीमुळे हा विश्वास वारंवार तुटत आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात येत आहे.

खरे तर एखाद्या नेत्याशी किंवा पक्षाशी मतभेद असू शकतात. विचारांमध्ये संघर्ष असू शकतो. परंतु अशा वेळी नैतिकतेचा मार्ग म्हणजे जनतेसमोर पुन्हा जाणे. पदाचा राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवणे ही लोकशाहीची खरी परीक्षा आहे. पण सध्याच्या राजकारणात असे धाडस क्वचितच दिसते. कारण अनेकांना जनतेच्या न्यायालयापेक्षा सत्तेची गणिते अधिक सुरक्षित वाटतात.

आज गरज आहे ती राजकीय नैतिकता पुनर्स्थापित करण्याची. पक्षांतर करणाऱ्यांवर कठोर कायदे असावेत, जनतेच्या मतांचा आदर राखला जावा आणि राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी आहे याची जाणीव नेत्यांनी ठेवावी. अन्यथा लोकशाहीचा आत्माच हरवण्याची भीती निर्माण होईल.

बंडखोरी जर जनतेच्या हितासाठी, अन्यायाविरुद्ध आणि तत्त्वांसाठी असेल तर ती इतिहास घडवते; पण जर ती केवळ सत्तेसाठी, पदासाठी आणि स्वार्थासाठी असेल तर ती लोकशाहीला लागलेला कलंक ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणासमोर आज हाच मोठा प्रश्न उभा आहे.
लोकशाहीची ताकद मतदारांच्या विश्वासात असते; आणि तो विश्वास तुटला, तर कोणतीही सत्ता कायम टिकू शकत नाही.

शेवटचे पत्र

- विलास खैरनार

गावाच्या टोकाला आंब्यांच्या दाट बागांनी वेढलेले एक जुने लाकडी घर होते. त्या घरात अन्वी नावाची एक साधी, शांत आणि मनाने अतिशय कोमल मुलगी राहत होती. पहाटेची चाहूल लागताच ती बागेत जाऊन पक्ष्यांना दाणे घालत असे. पक्ष्यांच्या किलबिलाटात, झाडांच्या सळसळत्या पानांत आणि निसर्गाच्या सहवासात तिचे आयुष्य निवांतपणे वाहत होते.

त्याच काळात अजय नावाचा एक तरुण शिक्षक शहरातून त्या गावातील शाळेत रुजू झाला. विचारांनी प्रगल्भ, वाचनाची आवड असलेला आणि विद्यार्थ्यांमध्ये रमणारा अजय गावकऱ्यांच्या मनात लवकरच घर करून गेला.

अन्वी आणि अजय यांची पहिली भेट गावातील शाळेच्या ग्रंथालयात झाली. अन्वी तिच्या धाकट्या बहिणीने घेतलेले पुस्तक परत करण्यासाठी आली होती. पुस्तकांच्या कपाटांमध्ये, शांत वातावरणात, नकळत त्यांच्या नजरा एकमेकींना भिडल्या. ती फक्त एक साधी भेट होती, पण त्या भेटीने दोघांच्या आयुष्यातील एका सुंदर अध्यायाची सुरुवात झाली.

हळूहळू संवाद वाढू लागला. पुस्तकांवरील चर्चा, आवडते लेखक, कविता, पावसाळ्यातील आठवणी आणि संध्याकाळच्या चहाच्या कपासोबत रंगणाऱ्या गप्पा यांमधून दोघे एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले. शब्दांपेक्षा त्यांच्या नजरा अधिक बोलत असत. त्यांच्या मनात एक सुंदर, निरागस प्रेम नकळत फुलू लागले होते.

एके संध्याकाळी, सूर्य मावळतीकडे झुकला असताना, अजयने अन्वीकडे पाहत विचारले,
"मी कधीतरी दूर गेलो, तर तुला माझी आठवण येईल का?"
अन्वी हलकेसे हसली. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.
"तुमच्या पुस्तकांप्रमाणे, तुम्ही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर कायम राहाल," ती हळुवारपणे म्हणाली.
त्या उत्तराने अजयच्या चेहऱ्यावर समाधानाच एक शांत हास्य उमटल.
पण आयुष्याला प्रत्येक सुंदर गोष्टीची परीक्षा घ्यायची सवय असते.
काही महिन्यांनंतर अजयची बदली शहरात झाली. निरोपाचा दिवस दोघांसाठीही खूप कठीण होता. डोळ्यांत अश्रू होते, पण ओठांवर धीर होता. त्यांनी एकमेकांना एक वचन दिले.
"अंतर कितीही असले तरी आपण दर महिन्याला एकमेकांना पत्र लिहू."
आणि मग पत्रांचा प्रवास सुरू झाला.
प्रत्येक पत्रात आठवणी होत्या, भावना होत्या, स्वप्ने होती. अन्वी पोस्टमनच्या पावलांची आतुरतेने वाट पाहत असे. अजयचे पत्र आले की तिचा दिवस उजळून निघत असे. त्या कागदांमध्ये तिला त्याचा आवाज ऐकू येत असे, त्याची उपस्थिती जाणवत असे.
एक वर्ष सरले.
मग दुसरेही वर्ष निघून गेले.
पण एके दिवशी अचानक पत्रे येणे बंद झाले.
पहिल्या महिन्यात अन्वीने स्वतःला समजावले. कदाचित कामात व्यस्त असेल, असे तिने मनाला पटवून दिले.
दुसरा महिना गेला.
तिसरा महिना गेला.
पण दारावर पोस्टमनची थाप पडली नाही.
तरीही आशा सोडणे तिला जमले नाही.
ती रोज दारात उभी राहून रस्त्याकडे पाहत असे. प्रत्येक सायकलच्या घंटीचा आवाज तिला पोस्टमनचा भास होत असे. प्रत्येक संध्याकाळी ती निराश होऊन परतत असे, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच आशेने वाट पाहत असे.
अशीच तीन वर्षे निघून गेली.
आणि मग एका दुपारी पोस्टमनने तिच्या दारावर थाप दिली.
थरथरणाऱ्या हातांनी अन्वीने पत्र घेतले. पाठवणाऱ्याचे नाव पाहून तिचे हृदय जोराने धडधडू लागले.
ते पत्र अजयचे नव्हते.
ते त्याच्या आईने पाठवले होते.
कंपित हातांनी तिने पत्र उघडले.
त्यात लिहिले होते
"प्रिय अन्वी,
अजय आता या जगात नाही.
काही वर्षांपूर्वी आजाराशी झुंज देताना त्याने अखेरचा श्वास घेतला. पण जाण्यापूर्वी त्याने तुझ्यासाठी काही पाने जपून ठेवली होती. ती तुला पोहोचवण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर सोपवली होती."
पत्रासोबत एक जुनी डायरी होती.
अश्रूंनी धूसर झालेल्या डोळ्यांनी अन्वीने ती उघडली.
शेवटच्या पानावर अजयचे हस्ताक्षर होते.
त्यात लिहिले होते
"अन्वी,
जर कधी तुला माझी उपस्थिती जाणवली, तर समजून घे की मी तुझ्याभोवतीच आहे.
तुझ्या आठवणींमध्ये, तुझ्या हसण्यात, तुझ्या अश्रूंमध्ये...
मी कुठेच गेलो नाही.
फक्त दिसेनासा झालो आहे.
तुझी वाट पाहत आहे... कायम."
ते शब्द वाचताना अन्वीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला.
त्या दिवसानंतर ती डायरी आणि ते शेवटचे पत्र तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा बनले.
ती रोज रात्री झोपण्यापूर्वी ते पत्र वाचत असे. प्रत्येक वेळी तिला असे वाटे की अजय तिच्याशी बोलत आहे. त्याचा आवाज अजूनही त्या शब्दांमध्ये जिवंत आहे.

वर्षे सरत गेली, ऋतू बदलले, आंब्याच्या बागेत नवी पालवी फुटली; पण अन्वीच्या उशीखाली ठेवलेले ते शेवटचे पत्र कधीच जुने झाले नाही.
कारण काही प्रेमकथा एकत्र राहून पूर्ण होत नाहीत...
त्या आठवणींच्या रूपाने, एका पत्राच्या रूपाने आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या भावनांच्या रूपाने अमर होतात. 

Tuesday, June 9, 2026

जनगणना : एक अस्मरणीय अनुभव

- विलास खैरनार

       नुकतेच आम्ही इयत्ता अकरावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांच्या कामातून बाहेर पडलो होतो. पेपर तपासणी, विविध कमिट्या, मिटिंग्स आणि सततची धावपळ यामुळे शरीर थकून गेलं होतं; पण शिक्षकाचं आयुष्य हे थांबायला शिकवत नाही. अशातच एका दुपारी मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला, “भारतीय जनगणना २०२६-२७.”
       मेसेज वाचताच मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. देशाच्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड झाली, ही जाणीव अभिमानाने भरून टाकणारी होती.
         आमच्या महाविद्यालयातील कामात तत्पर, जबाबदार आणि होतकरू अशा बारा प्राध्यापकांची भारतीय जनगणना आयोगाने निवड केली होती आणि त्यात माझाही समावेश होता. सुरुवातीला हे काम साधंसोपं वाटत होतं; पण पुढचे काही दिवस आयुष्यातील वेगळे अनुभव देणारे ठरणार आहेत, याची कल्पना तेव्हा नव्हती.
     जनगणनेचं प्रशिक्षण सुरू झालं आणि त्याचसोबत उन्हाळ्याची तीव्रताही वाढू लागली. बाहेर तापमान चाळीस-पंचेचाळीस अंशांच्या घरात पोहोचलं होतं. प्रशिक्षण हॉलमध्ये पंखे होते; पण ते फक्त नावालाच फिरत होते. खरं तर आमच्यासोबत ते पंखेसुद्धा घामाघूम झाले होते. सगळे जण खिडकीजवळ जागा पकडण्यासाठी धडपड करत होते. मलाही वाटायचं की खिडकीत बसलं तर थोडा गारवा मिळेल; पण तिथून येणारी हवा म्हणजे जणू गरम भट्टीतून बाहेर पडणारी वाफ होती. ती थेट चेहऱ्यावर आदळायची आणि घाम आणखी वाढवायची.
       समोर प्रशिक्षण देणारे अधिकारी मात्र इतक्या जोशात जनगणनेचं महत्त्व सांगत होते की जणू आम्हाला थेट सीमारेषेवर पाठवणार होते. देशासाठी हे काम किती महत्त्वाचं आहे, प्रत्येक नागरिकाची माहिती देशाच्या विकासासाठी किती आवश्यक आहे, हे ते इतक्या आवेशाने सांगत होते की नकळत छाती अभिमानाने भरून आली.
इतक्यात महाविद्यालयातून फोन आला,
“अकरावीचा निकाल तयार करायचा आहे.”
आता खरी कसरत सुरू झाली. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत गरमीत प्रशिक्षण घ्यायचं आणि मग घरी जाऊन निकालाचं काम करायचं. दिवसभराच्या उकाड्याने शरीर थकून जायचं; पण जबाबदारी टाळणं शक्य नव्हतं. अशा कठीण परिस्थितीतून अखेर तीन दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण झालं.

प्रशिक्षण संपलं आणि आता सुरू झालं जनगणनेचं खरं काम.

      आम्हाला दिलेल्या परिसराचा नकाशा तयार करायचा होता. प्रत्येक इमारतीला क्रमांक द्यायचा होता. सुरुवातीला हे काम थोडं तांत्रिक वाटलं; पण जसजसं काम पुढे जाऊ लागलं, तसं त्या परिसराशी आणि तिथल्या लोकांशी एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं.
दररोज सकाळी ओळखपत्र, पाण्याची बाटली आणि डोक्यावर उन्हाचा तडाखा घेऊन आम्ही घराघरात फिरू लागलो. प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती घ्यायची. प्रश्नांची यादी इतकी मोठी होती की काही वेळा मलाच वाटायचं “हे आपण जनगणना करतोय की मुलाखत घेतोय?”
“तुमच्या घरात किती लोक राहतात?”
“लग्न झालेले जोडपे किती?”
“तुम्ही रेडिओ ऐकता का?”
“टीव्ही पाहता का?”
“केबल आहे की डीटीएच?”
“नळाला पाणी येतं का?”
“सांडपाणी कुठे जातं?”
“बंद गटारात की उघड्यावर?”
“जास्त काय खाता - गहू की तांदूळ?”
असे तब्बल चौतीस प्रश्न विचारायचे होते.
पण खरी गंमत प्रश्न विचारण्यात नव्हती; तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, हावभाव आणि प्रतिक्रिया समजून घेण्यात होती. एका घरासाठी किमान दहा मिनिटं लागत होती. त्यातली पाच मिनिटं तर फक्त दरवाजा उघडायला जात होती. मी बेल वाजवली की आतून मोठा आवाज यायचा 
“कोण आहे?”
मी उत्तर द्यायचो 
“जनगणना करायला आलो आहे.”
मग दरवाजा हळूच उघडायचा. सकाळची वेळ असेल तर काही जण डोळे चोळत, आळस देत बाहेर यायचे. काही लोक तर फक्त अंडरवेअरवरच दरवाज्यात उभे राहत होते. त्या क्षणी हसूही आवरायचं आणि कामही करायचं. मग मी मनातच म्हणायचो 
“आता याची गणना नेमकी कशी करायची?”

काही लोक अतिशय प्रेमाने बोलायचे. पाणी द्यायचे, खुर्ची द्यायचे. तर काही लोकांना संशय वाटायचा की आपण सरकारी अधिकारी नसून कदाचित काहीतरी वेगळंच काम करतोय.
एक कुटुंब तर थेट म्हणालं 
“आम्हाला जनगणना करायची नाही.”
त्यावेळी मलाही थोडा अधिकार दाखवावा लागला. मी शांतपणे म्हणालो 
“माहिती दिली नाही तर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकतं.”
माझं वाक्य ऐकताच पूर्ण कुटुंब गंभीर झालं. मग त्यांनी अगदी नीटपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्या प्रसंगानंतर मला जाणवलं की सरकारी कामामध्ये संयमाइतकाच आत्मविश्वासही महत्त्वाचा असतो.

      एका घरी गेलो तर घरात एकच व्यक्ती होती आणि तीही दारू पिऊन गोंधळलेल्या अवस्थेत. आता त्याला भारतीय जनगणना आयोगाचे चौतीस तत्त्वनिष्ठ प्रश्न विचारायचे होते! तिथून कसाबसा पुढे गेलो तर एका बाईंनी मला पाहताच दरवाजा बंद केला. त्यांनी जणू मला एखादा “बोवा”च समजलं असावं.
मी खिशातून रुमाल काढला, घाम पुसला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो 
“अहो मावशी… दरवाजा उघडा!”
इतक्यात पूर्ण कॉलनीच त्या घराजवळ जमा झाली. माझा हा तमाशा तब्बल अर्धा तास चालला; पण त्या मावशींनी काही दरवाजा उघडला नाही. शेवटी मी हार मानली आणि तिथून निघून गेलो.
        एक माणूस तर इतका संशयी होता की त्याने माझे फोटो काढले, तेही आयडी कार्डसह! जणू मी त्याच्या मालमत्तेवर कब्जा करायला आलो होतो.
त्या क्षणी हसू आवरत नव्हतं; पण त्याचवेळी लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल किती शंका आणि भीती असते, हेही लक्षात आलं.

        या सगळ्या प्रवासात अनेक प्रकारची माणसं भेटली. काही श्रीमंत, काही गरीब, काही शिक्षित, काही अशिक्षित; पण प्रत्येक घरामागे एक वेगळी कथा होती. कुठे वृद्ध आई-वडील एकटे राहत होते, कुठे लहान मुलांच्या गोंधळाने घर भरलेलं होतं, तर कुठे दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणारी माणसं दिसत होती.
त्या ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात फिरताना शरीर थकलं, चेहरा काळवंडला, पाय दुखले; पण मन मात्र अनुभवांनी समृद्ध झालं.
जनगणना हे फक्त आकडे मोजण्याचं काम नाही, तर देशातील माणसं, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं वास्तव जवळून पाहण्याची संधी आहे.
या कामाने मला संयम शिकवला, लोकांशी संवाद साधायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरामागे एक संघर्ष दडलेला असतो, याची जाणीव करून दिली.
      आता काही प्रसंगांची आठवण आली की चेहऱ्यावर नकळत हसू येतं. उन्हाचा तडाखा, लोकांचे वेगवेगळे स्वभाव, घराघरातील अनुभव आणि त्या चौतीस प्रश्नांची अखंड मालिका, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
खरंच, जनगणना हे माझ्यासाठी फक्त सरकारी काम नव्हतं;
तो आयुष्य समजून घेण्याचा एक अस्मरणीय अनुभव होता.

Wednesday, March 18, 2026

भक्तीचा डंका

मंदिरातील पुजारीनेच
दान पेटीवर डल्ला मारला
अन् देवाचा कोप म्हणत
गावभर डंका वाजवला

जिथे श्रद्धा नतमस्तक होती
तिथेच विश्वास लुटला गेला
देवाच्या नावाखाली
माणूसपणा हरवला गेला


देव तर शांत उभा होता
माणसाचा खेळ पाहत
पण सत्य मात्र कुजबुजत होतं
“पाप मंदिरात नाही,
ते माणसाच्या मनात होतं”

डंका वाजतो देवाच्या कोपाचा
पण कोप झाला कुणावर ?
दान पेटी लुटणाऱ्यावर की,
विश्वास ठेवणाऱ्यावर ?

शेवटी देव नाही रागावला
रागावली ती माणुसकी
कारण पुजाऱ्यानेच
श्रद्धेची केली चोरी
        - विलास खैरनार 

Friday, January 23, 2026

यमुना

- विलास खैरनार 

         यमुना जेव्हा जेव्हा गावात यायची, तेव्हा तिची पावलं नकळत गावाच्या कडेला वळायची. तिथं एक छोटीशी टेकडी होती, मातीची, झाडांनी वेढलेली, आणि काळाच्या ओघात थकलेली. त्या टेकडीवर प्राचीन काळातलं एक मंदिर होतं. कुणी सांगितलं नव्हतं तिला तिथं जायला; तरीही तिचं मन तिथंच ओढलं जायचं.
मंदिराची पायरी चढताना तिचं काळीज नेहमीच भरून यायचं. त्या दगडी पायऱ्यांवरून चालताना तिला वाटायचं, आपण फक्त वर चढत नाहीये, तर आठवणींच्या खोल गर्भात उतरतोय.
        हे मंदिर फक्त देवासाठी नव्हतं, ते साक्षीदार होतं.
याच मंदिरात, या टेकडीवर, तुका आणि यमुनाची भेट झाली होती.
      तुका गावातला साधा मुलगा. वडिलांची लहानशी शेती, आईचं कष्टाचं आयुष्य. त्याच्या हातात कायम मातीची रेघ होती. तो कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या शब्दांत प्रामाणिकपणा असायचा. यमुना मात्र वेगळी होती, श्रीमंत घरातली, नाजूक, शिकलेली, डोळ्यांत स्वप्नं घेऊन फिरणारी.
       सुरुवातीला त्यांच्या भेटी योगायोग होत्या. यमुना देवाला नमस्कार करायला यायची, तुका मंदिर साफ करायला. हळूहळू ते योगायोग सवयी झाले. रोज संध्याकाळी, सूर्य मावळतीला झुकला की, दोघं त्या टेकडीवर भेटू लागले.
      मंदिराच्या घंटानादात त्यांचं बोलणं हरवायचं. ते मोठ्या स्वप्नांची चर्चा करत नसत; ते साध्या गोष्टी बोलायचे पावसाबद्दल, शेतीबद्दल, आयुष्याबद्दल. पण त्या साधेपणातच प्रेम रुजत गेलं.
          तुका जाणून होता आपली गरिबी. यमुना जाणून होती आपली मर्यादा. तरीही दोघं त्या सत्यापासून दूर पळत होते. मंदिराच्या सावलीत त्यांना सगळं शक्य वाटायचं. पण गाव लहान असतं आणि अफवा वेगाने पसरतात. यमुनाच्या घरात तिचं लग्न ठरल्याची बातमी आली. श्रीमंत घराणं, मोठा व्यवसाय. घरात आनंद होता; फक्त यमुनाच्या मनात शांतता नव्हती. तिने शेवटच्यांदा मंदिरात येऊन देवापुढं डोळे मिटले. त्या दिवशी तुका आला नाही. तो आला असता, तर कदाचित ती कोसळली असती.
          लग्नानंतर यमुना गावातून निघून गेली. टेकडी ओस पडली. मंदिर शांत झालं. तुकाचं आयुष्य मात्र तिथंच थांबलं. तो रोज मंदिरात जायचा, एकटाच. देवाला काही मागायचा नाही; फक्त बसून राहायचा. कधी कधी त्याला वाटायचं, यमुना अजूनही त्या पायऱ्या चढत येईल.
पण एक दिवस गावात बातमी आली, तुकाचं निधन झालं. कारण कुणालाच नीट माहीत नव्हतं. कुणी आजार म्हणालं, कुणी दु:ख. पण तुकालाच कारण माहीती; तो फक्त वेदना सोबत घेऊन गेला होता. तुकाचे अश्रू जणू टेकडीच्या मातीत मिसळून गेले. आता तुका या दुनियेत नव्हता, होत्यात फक्त आठवणी
      आता यमुना गावात आली की, तिला ते सगळं आठवतं. मंदिर, टेकडी, तुका आणि अपूर्ण राहिलेलं प्रेम. मंदिराच्या दगडांवर हात फिरवताना तिच्या डोळ्यांत पाणी येतं. ती रडते नशिबावर, समाजावर, आणि त्या प्रेमावर, ज्याला नाव मिळालं नाही. मंदिर अजूनही उभं आहे. टेकडी अजूनही तिथंच आहे. फक्त काही प्रेमकथा देवाजवळ जाऊनही पूर्ण होत नाहीत त्या फक्त आठवण बनून राहतात. समाजाच्या भिंती कधी कधी माणसांपेक्षा उंच असतात. प्रेम देवळात फुलतं, पण जगाच्या वास्तवात कोमेजतं. तरीही काही आठवणी माणसाला आयुष्यभर माणूस म्हणून जिवंत ठेवतात.

Monday, January 5, 2026

आजचा मिडिया

मिडीयाचा कॅमेरा आता आरसा राहिला नाही
तो मालकाच्या तिजोरीकडे वळलेला आहे
माईक सत्याचा आवाज नाही
तो सौद्याची पावती बनला आहे

काल जो प्रश्न विचारायचा सत्तेला
तो आज स्क्रिप्ट वाचतो आहे
शाई विकली गेली आहे
कागद गहाण पडला आहे

रक्त वाहतंय रस्त्यावर
पण ब्रेकिंग न्यूजमध्ये
सेलिब्रिटीचा कुत्रा हरवलाय

लोकशाही चौथा स्तंभ म्हणे
पण हा स्तंभ आता
सत्तेच्या पायाशी
लोटांगण घालतोय!

जे बोलले ते देशद्रोही
ज्यांनी प्रश्न विचारले ते अर्बन नक्षल
अन् जे गप्प बसले
तेच “वरिष्ठ संपादक”!

तरीही…
एखादा तरी पत्रकार अजून जिवंत आहे
जो भीक न मागता प्रश्न विचारतो आहे
जो दलालीपेक्षा ही
अंतरात्म्याला मोठं मानतो आहे
त्यांच्यासाठी ही फक्त एक कविता आहे
अन् त्या दलालांसाठी एक इशारा आहे
                   - विलास खैरनार 

Sunday, December 21, 2025

बस स्टँडवर उभा असलेला काळ

 - विलास खैरनार 

मी आज साक्री बस स्टँडवर शांत उभा होतो. डोळे रस्त्याकडे लागलेले, कानात वाहनांचा आवाज, हातात मोबाईल, आणि मनात एकच विचार,बस केव्हा येईल? घड्याळाकडे वारंवार पाहण्याची सवय लागली आहे. वेळेच्या काट्यावर आयुष्य मोजणारी ही आजची धावपळ, कुठे थांबू देत नाही. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं झालं आहे. उशीर म्हणजे नुकसान, थांबणं म्हणजे वेळेची नासाडी, असं आजचं गणित झालं आहे. पण याच बस स्टँडवर उभा राहून, आज अचानक एक वेगळाच काळ आठवला.

तो एक काळ होता…

जेव्हा बस येण्याची घाईच नसायची. तेव्हा आम्ही तासंतास बसची वाट पाहायचो. बस उशिरा आली, रद्द झाली, दुसरी पकडावी लागली, काहीही झालं तरी ताण नव्हता, चिडचिड नव्हती. कारण तेव्हा वेळ आमच्यासोबत चालायचा. आज मात्र आपण वेळेमागे धावत आहोत, आणि तरीही तो गाठता येत नाही. कॉलेज सुटलं की थेट बस स्टँड. ते फक्त थांबायचं ठिकाण नव्हतं, ते आमचं दुसरं जग होतं. हातात दोन पुस्तकं, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत उत्सुकता. कोण येईल, कोण नाही, आज कोणती चर्चा रंगेल याची आतुरता असायची. मित्र, मैत्रिणी, ओळखीचे चेहरे, कधी कधी एखादी अनोळखी पण हळूहळू आपली होणारी व्यक्ती. चहाच्या टपरीवरचा तो उकळता चहा, भेळीचा कागदी कोन, वडापावचा वास, आणि त्यासोबत न संपणाऱ्या गप्पा. कोणी भविष्याची स्वप्नं रंगवायचं,“आपण मोठं काहीतरी करूया,”कोणी सरकारी नोकरीची स्वप्नं पाहायचं, कोणी गाव सोडून जायचं स्वप्न पाहायचं, तर कोणी कुठेच न जाण्याचं. कोणी एखाद्या प्रेमकथेचा हळूच उल्लेख करायचं, नाव न घेता, पण सगळ्यांना कळेल अशा शब्दांत. कोणी शिक्षकांवर टीका करायचं,कोणी कॉलेजच्या व्यवस्थेवर, तर कोणी थेट संपूर्ण समाजावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं.त्या गप्पांमध्ये ना मोबाईल होता, ना नोटिफिकेशनचा आवाज, ना कॉल कट झाल्याची घाई. फक्त हसणं होतं, ऐकणं होतं, आणि मनसोक्त जगणं होतं.

तेव्हा बस स्टँड म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नव्हतं. ते एक थांबलेलं आयुष्य होतं, जिथे वेळ थांबायचा, क्षण अनुभवले जायचे, आणि माणसं माणसांसोबत असायची. आज तोच बस स्टँड आहे. तोच रस्ता, तोच फलक, तीच चहाची टपरी. पण चेहरे बदललेत. आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. हेडफोन कानात, डोळे स्क्रीनवर, आणि मन कुठे तरी दूर. नात्यांची जागा हेडफोननी घेतली आहे, गप्पांची जागा स्क्रीनने, आणि भेटींची जागा “स्टेटस” आणि “रील्स”नी.

आज बस उशिरा झाली तर चिडचिड होते. तक्रार करावीशी वाटते.कोणाला तरी दोष द्यावासा वाटतो. कारण आज वेळ कमी आहे. आणि आठवणींसाठी वेळच उरलेला नाही. बस येते, मी चढतो, प्रवास सुरू होतो. पण मन मात्र मागेच राहून जातं, त्या काळात, त्या मित्रांमध्ये, त्या निष्काळजी, निर्मळ दिवसांमध्ये.

खरंच, तेव्हा बसची वाट पाहणं कंटाळवाणं नव्हतं.तो एक अनुभव होता. एक जगणं होतं. एक शिकवण होती, की आयुष्य म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर थांबणंही आहे. आज बस येण्याची वाट पाहतो, पण त्या काळाची बस कधीच येणार नाही… हे उमगूनही मन मात्र दरवेळी त्या जुन्या बस स्टँडवर थोडा वेळ थांबतंच. कारण काही जागा, काही क्षण, आणि काही माणसं, काळाच्या पुढे जात नाहीत, ती मनातच थांबलेली असतात, कायमची.




Saturday, November 29, 2025

कर्णाचा प्रश्न

कृष्णा...!
तू देव? 
की रणाचा नट?
तू बोललास धर्म, 
पण चाललास कपट!
माझ्या रथाचं चाक चिखलात अडलं,
अन् तू हसलास  
"मार अर्जुना, वेळ आली!" 
असं म्हणालास...

हेच का तुझं धर्मयुद्ध, 
हेच का तुझं गीतेचं तत्त्व?
कमकुवत क्षणी प्रहार, 
हीच का तुझी नीती वचने?
मी धनुष्य खाली ठेवला 
अन् तू माझा जीव घेतला 

मी दानशूर होतो, 
पण नशिबानं फुटका होतो,
जातीनं सुतपुत्र, 
म्हणून मी हरलो का?
देवाचा मित्र असूनही, 
देवानेच मला फसवलं,

कृष्णा...!
अजूनही मनात एकच प्रश्न आहे 
हे तुझं देवत्व होतं 
की राजकारण होतं?
             - विलास खैरनार

जीवाभावाचा मित्र

माझा मित्र
जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो 

प्रत्येक संध्याकाळ येते 
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी

डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं

मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत

त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली 

तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी

कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण, 
जिवंत कविता
           - विलास खैरनार 

Thursday, November 27, 2025

ज्ञानोबा

ज्ञानोबा...
तु शब्दांचा महासागर असतांना 
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.

तु लिहीत गेलास गीतेतील ओवी, 
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी

वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,  
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास 
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."  
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला 
फक्त भावनांची बोली उरली,  
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.

तु सांगशील का, ज्ञानोबा,  
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?  
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?

तुच शिकवलंस  
भक्ती म्हणजे प्रेम,  
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,  

कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी, 
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
                                         - विलास खैरनार 

Tuesday, November 25, 2025

भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक

- विलास खैरनार 

भारतीय संविधान लिहून झाले तेव्हा देशाचा व भवितव्याच्या डोळ्यांत आशेचा तेजोमय प्रकाश होता. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार मशाली हातात घेऊन नव्या राष्ट्रानं प्रवास सुरू केला.
पण आज प्रश्न असा आहे, आपण त्या मशाली पेटवून ठेवतोय की त्यांच्या सावलीत अंधारच वाढवत आहोत?
संविधान म्हणतं “सर्वांना समान अधिकार” पण जमिनीवर अजूनही माणूस जातीवर मोजला जातो, धर्मावर तोलला जातो, पैशावर विकला जातो.
हा कोणता न्याय? हा कोणता विकास?

आजही एखादी मुलगी शिक्षणासाठी लढते, एखादा तरुण नोकरीसाठी धावतो, गरीब न्यायासाठी भटकतो…
आणि वरचे लोक संविधानाचे तख्त धारण करून फक्त भाषणं देत राहतात. संविधान समानता शिकवतं, समाज मात्र अजूनही भेदभावाच्या घाणेरड्या जाळ्यात गुदमरतो.
संविधानानं आवाज दिला, पण आज आवाज उठला की त्याला “देशद्रोही” असा शिक्का मिळतो. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या मागे नोटिसा धावतात. विद्यार्थी बोलले तर त्यांना आंदोलनात गुन्हेगार बनवलं जातं.
लेखक-कलावंत यांनी मत मांडले की त्यांच्यावर सोशल मीडिया तलवारी उगारतो. स्वातंत्र्य देणारं संविधान जिवंत आहे, पण आवाज दाबण्याची प्रवृत्ती त्याच्यावर धूळ टाकत आहे.

भारताचा आत्मा विविधतेत आहे. पण आज धर्मांच्या नावावर द्वेष पेरला जातो, भीती विकली जाते, आणि श्रद्धेच्या आडून सत्तेचा व्यापार केला जातो. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं शील आहे, पण आज तिचं अपहरण करून तिला राजकीय सभांमध्ये ढोल - ताशे फिरवले जातात.
धर्म जितका मोठा केला तितका माणूस लहान होत जातो आणि हाच विद्रोहाचा क्षण आहे. संविधानानं सत्ता मर्यादित ठेवली. पण आज सत्तेला मर्यादा नाहीत,
उलट लोकशाहीला मर्यादा लावल्या जातात. सत्तेत बसलेले लोक टीका ऐकू इच्छित नाहीत, विरोधकांना शत्रू मानतात, आणि प्रशासनाला स्वतःच्या हातातली बाहुली बनवतात. न्यायालय, माध्यम, संसद ज्या संस्थांनी लोकशाही सांभाळायची, त्यांना कमकुवत करण्याची स्पर्धा दिसते. संविधान संस्था मजबूत करायला सांगतं; सत्ता मात्र संस्थांना वाकवायला धडपडते. पण हा देश फक्त शासकांच्या हातात नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या विवेकात आहे. तरीही आपणच लोकशाहीला जखमा देतो,
धोका कुणाकडूनच नव्हे, कधी कधी आपल्या शांततेतूनही वाढतो.

संविधान अजूनही शक्तिशाली आहे, पण त्याची अंमलबजावणी कमजोर. समाजात वाढणारा अन्याय,
राजकारणात वाढणारी दुटप्पीपणा, सत्तेच्या अहंकारात हरवलेली जबाबदारी, लोकांच्या विचारांवर वाढणारे ध्रुवीकरण हे सगळं या महान दस्तावेजाच्या पायावर घाव घालणारं आहे. विद्रोह म्हणजे हिंसा नाही, विद्रोह म्हणजे प्रश्न विचारणं, अन्यायाला “नाही” म्हणणं, संविधानातल्या मूल्यांना पुन्हा प्रज्वलित करणं. कारण शेवटी, संविधान जिवंत तेव्हाच राहील, जेव्हा आपण जागृत राहू.



Monday, November 24, 2025

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार 

Friday, November 21, 2025

गावाकडचा प्रवास

- विलास खैरनार 

        गावाकडे जाणं म्हणजे केवळ प्रवास नसतो, तो आत्म्याच्या मुळांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. शहराच्या गोंगाटातून सुटका करून मी गावाकडे जायचं ठरवलं आणि एका सकाळी बॅग खांद्यावर टाकून बसस्थानकाच्या दिशेने निघालो. प्रवासात धावणारी झाडं, एकसारख्या लयीत चालणारी शेतं, अधूनमधून दिसणारी झोपडी, हे सगळं जणू माझ्या मनातल्या आठवणींची दारं उघडत होतं.

       बस गावात शिरताच मातीचा गंध जणू स्वागताला समोर उभा राहिला. छोट्या रस्त्यावरची कुत्र्यांची गडबड, दुकानासमोर उभ्या सायकली, आणि घराच्या ओट्यावर गप्पा मारणारे बाया, हे दृश्य इतकं ओळखीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की क्षणभर शहरातल्या धकाधकीबद्दल मनातल्या मनातच हसू आलं.

      घराच्या अंगणात पाय ठेवताच चुलीचा मंद धूर आणि आईचा आवाज दोन्ही कानावर पडले. “आलास का रे?” त्या एका वाक्यात कित्येक दिवसांची ओढ, काळजी, प्रेम सगळं सामावलेलं होतं.

        दुसऱ्याच दिवशी मी शेताकडे निघालो. पहाटेचं थंडगार हवामान, पाखरांचे किलबिलाट, आणि पायाखाली साचलेली दवबिंदूची ओल, हे सगळं मनात एका वेगळ्या शांततेचं वस्त्र उलगडत होतं.

      शेतात पाय ठेवल्यावर मातीचा राप माझ्या पायांना चिकटला, जणू म्हणत होता “तू कुठेही जा, पण माझ्यापासून दूर नाही.”
कडधान्याच्या शेतात मंद वारा डोलत होता. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाज येत होता.
मी नांगराच्या मागे चालणाऱ्या काकांच्या गप्पा ऐकत काही काळ शांत उभा राहिलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताना म्हटलं,
“शहरातलं आयुष्य मोठं झालं रे, पण सुख अजून ह्या मातीच्या ओलितचं आहे.”
त्या वाक्यानं मनात कुठेतरी दरवाजा दणकन उघडला.

        शेतातून परतताना अचानक मनात आलं—“चल, डोंगरावर जाऊया…”
बालपणी ज्या डोंगरावर मी, माझी मित्र धावतफिरत, गोट्या खेळत भटकत असायचो, त्याच डोंगराचं शिखर आज पुन्हा मला बोलवत होतं.

         मी तिथपर्यंत पायीच निघालो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच वेगळीच हवा सुरू झाली थंड, स्वच्छ आणि सुगंधी. प्रत्येक पायरीवर मला माझं जुनं रूप भेटत होतं.
ज्या झाडामागे लपून आम्ही “लपाछपी” खेळायचो ते अजूनही तिथे उभेच आहेत.
एकेक खडक, एकेक दगड जणू माझी वाट पाहत होते.

        शिखरावर पोहोचलो तेव्हा खाली सगळं गाव दिसत होतं, शेतं, ओढा, मंदिरे, लाल कौलांची घरं…
वाऱ्याच्या एका जोरदार झुळुकेत मनाला स्पष्ट जाणवलं “जीवन किती धावतंय, आणि आपण किती विसरत चाललोय…”
त्या उंचीवर काही क्षण स्वतःशीच बसून राहणं म्हणजे एक प्रकारची साधना होती.

      रात्री अंगणात खाट टाकून मी झोपायला गेलो.
आकाश भरलं होतं ताऱ्यांनी.
वाऱ्याचा मंद आवाज, आसपासचा अंधार, आणि त्या शांततेत येणाऱ्या मातीच्या गंधाने मनात एकच विचार पक्का झाला.
“या मातीशी नातं तुटत नाही… काहीही झालं तरी नाही.”

       त्या रात्री झोपताना मला जाणवलं, गावाकडा जाणं म्हणजे बाहेरचा प्रवास नव्हे, तो आतल्या प्रवासाचा आरंभ असतो.