शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

कर्णाचा प्रश्न

कृष्णा...!
तू देव? 
की रणाचा नट?
तू बोललास धर्म, 
पण चाललास कपट!
माझ्या रथाचं चाक चिखलात अडलं,
अन् तू हसलास  
"मार अर्जुना, वेळ आली!" 
असं म्हणालास...

हेच का तुझं धर्मयुद्ध, 
हेच का तुझं गीतेचं तत्त्व?
कमकुवत क्षणी प्रहार, 
हीच का तुझी नीती वचने?
मी धनुष्य खाली ठेवला 
अन् तू माझा जीव घेतला 

मी दानशूर होतो, 
पण नशिबानं फुटका होतो,
जातीनं सुतपुत्र, 
म्हणून मी हरलो का?
देवाचा मित्र असूनही, 
देवानेच मला फसवलं,

कृष्णा...!
अजूनही मनात एकच प्रश्न आहे 
हे तुझं देवत्व होतं 
की राजकारण होतं?
             - विलास खैरनार

जीवाभावाचा मित्र

माझा मित्र
जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो 

प्रत्येक संध्याकाळ येते 
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी

डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं

मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत

त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली 

तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी

कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण, 
जिवंत कविता
           - विलास खैरनार 

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानोबा

ज्ञानोबा...
तु शब्दांचा महासागर असतांना 
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.

तु लिहीत गेलास गीतेतील ओवी, 
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी

वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,  
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास 
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."  
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला 
फक्त भावनांची बोली उरली,  
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.

तु सांगशील का, ज्ञानोबा,  
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?  
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?

तुच शिकवलंस  
भक्ती म्हणजे प्रेम,  
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,  

कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी, 
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
                                         - विलास खैरनार 

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक

- विलास खैरनार 

भारतीय संविधान लिहून झाले तेव्हा देशाचा व भवितव्याच्या डोळ्यांत आशेचा तेजोमय प्रकाश होता. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार मशाली हातात घेऊन नव्या राष्ट्रानं प्रवास सुरू केला.
पण आज प्रश्न असा आहे, आपण त्या मशाली पेटवून ठेवतोय की त्यांच्या सावलीत अंधारच वाढवत आहोत?
संविधान म्हणतं “सर्वांना समान अधिकार” पण जमिनीवर अजूनही माणूस जातीवर मोजला जातो, धर्मावर तोलला जातो, पैशावर विकला जातो.
हा कोणता न्याय? हा कोणता विकास?

आजही एखादी मुलगी शिक्षणासाठी लढते, एखादा तरुण नोकरीसाठी धावतो, गरीब न्यायासाठी भटकतो…
आणि वरचे लोक संविधानाचे तख्त धारण करून फक्त भाषणं देत राहतात. संविधान समानता शिकवतं, समाज मात्र अजूनही भेदभावाच्या घाणेरड्या जाळ्यात गुदमरतो.
संविधानानं आवाज दिला, पण आज आवाज उठला की त्याला “देशद्रोही” असा शिक्का मिळतो. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या मागे नोटिसा धावतात. विद्यार्थी बोलले तर त्यांना आंदोलनात गुन्हेगार बनवलं जातं.
लेखक-कलावंत यांनी मत मांडले की त्यांच्यावर सोशल मीडिया तलवारी उगारतो. स्वातंत्र्य देणारं संविधान जिवंत आहे, पण आवाज दाबण्याची प्रवृत्ती त्याच्यावर धूळ टाकत आहे.

भारताचा आत्मा विविधतेत आहे. पण आज धर्मांच्या नावावर द्वेष पेरला जातो, भीती विकली जाते, आणि श्रद्धेच्या आडून सत्तेचा व्यापार केला जातो. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं शील आहे, पण आज तिचं अपहरण करून तिला राजकीय सभांमध्ये ढोल - ताशे फिरवले जातात.
धर्म जितका मोठा केला तितका माणूस लहान होत जातो आणि हाच विद्रोहाचा क्षण आहे. संविधानानं सत्ता मर्यादित ठेवली. पण आज सत्तेला मर्यादा नाहीत,
उलट लोकशाहीला मर्यादा लावल्या जातात. सत्तेत बसलेले लोक टीका ऐकू इच्छित नाहीत, विरोधकांना शत्रू मानतात, आणि प्रशासनाला स्वतःच्या हातातली बाहुली बनवतात. न्यायालय, माध्यम, संसद ज्या संस्थांनी लोकशाही सांभाळायची, त्यांना कमकुवत करण्याची स्पर्धा दिसते. संविधान संस्था मजबूत करायला सांगतं; सत्ता मात्र संस्थांना वाकवायला धडपडते. पण हा देश फक्त शासकांच्या हातात नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या विवेकात आहे. तरीही आपणच लोकशाहीला जखमा देतो,
धोका कुणाकडूनच नव्हे, कधी कधी आपल्या शांततेतूनही वाढतो.

संविधान अजूनही शक्तिशाली आहे, पण त्याची अंमलबजावणी कमजोर. समाजात वाढणारा अन्याय,
राजकारणात वाढणारी दुटप्पीपणा, सत्तेच्या अहंकारात हरवलेली जबाबदारी, लोकांच्या विचारांवर वाढणारे ध्रुवीकरण हे सगळं या महान दस्तावेजाच्या पायावर घाव घालणारं आहे. विद्रोह म्हणजे हिंसा नाही, विद्रोह म्हणजे प्रश्न विचारणं, अन्यायाला “नाही” म्हणणं, संविधानातल्या मूल्यांना पुन्हा प्रज्वलित करणं. कारण शेवटी, संविधान जिवंत तेव्हाच राहील, जेव्हा आपण जागृत राहू.



सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार 

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

गावाकडचा प्रवास

- विलास खैरनार 

        गावाकडे जाणं म्हणजे केवळ प्रवास नसतो, तो आत्म्याच्या मुळांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. शहराच्या गोंगाटातून सुटका करून मी गावाकडे जायचं ठरवलं आणि एका सकाळी बॅग खांद्यावर टाकून बसस्थानकाच्या दिशेने निघालो. प्रवासात धावणारी झाडं, एकसारख्या लयीत चालणारी शेतं, अधूनमधून दिसणारी झोपडी, हे सगळं जणू माझ्या मनातल्या आठवणींची दारं उघडत होतं.

       बस गावात शिरताच मातीचा गंध जणू स्वागताला समोर उभा राहिला. छोट्या रस्त्यावरची कुत्र्यांची गडबड, दुकानासमोर उभ्या सायकली, आणि घराच्या ओट्यावर गप्पा मारणारे बाया, हे दृश्य इतकं ओळखीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की क्षणभर शहरातल्या धकाधकीबद्दल मनातल्या मनातच हसू आलं.

      घराच्या अंगणात पाय ठेवताच चुलीचा मंद धूर आणि आईचा आवाज दोन्ही कानावर पडले. “आलास का रे?” त्या एका वाक्यात कित्येक दिवसांची ओढ, काळजी, प्रेम सगळं सामावलेलं होतं.

        दुसऱ्याच दिवशी मी शेताकडे निघालो. पहाटेचं थंडगार हवामान, पाखरांचे किलबिलाट, आणि पायाखाली साचलेली दवबिंदूची ओल, हे सगळं मनात एका वेगळ्या शांततेचं वस्त्र उलगडत होतं.

      शेतात पाय ठेवल्यावर मातीचा राप माझ्या पायांना चिकटला, जणू म्हणत होता “तू कुठेही जा, पण माझ्यापासून दूर नाही.”
कडधान्याच्या शेतात मंद वारा डोलत होता. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाज येत होता.
मी नांगराच्या मागे चालणाऱ्या काकांच्या गप्पा ऐकत काही काळ शांत उभा राहिलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताना म्हटलं,
“शहरातलं आयुष्य मोठं झालं रे, पण सुख अजून ह्या मातीच्या ओलितचं आहे.”
त्या वाक्यानं मनात कुठेतरी दरवाजा दणकन उघडला.

        शेतातून परतताना अचानक मनात आलं—“चल, डोंगरावर जाऊया…”
बालपणी ज्या डोंगरावर मी, माझी मित्र धावतफिरत, गोट्या खेळत भटकत असायचो, त्याच डोंगराचं शिखर आज पुन्हा मला बोलवत होतं.

         मी तिथपर्यंत पायीच निघालो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच वेगळीच हवा सुरू झाली थंड, स्वच्छ आणि सुगंधी. प्रत्येक पायरीवर मला माझं जुनं रूप भेटत होतं.
ज्या झाडामागे लपून आम्ही “लपाछपी” खेळायचो ते अजूनही तिथे उभेच आहेत.
एकेक खडक, एकेक दगड जणू माझी वाट पाहत होते.

        शिखरावर पोहोचलो तेव्हा खाली सगळं गाव दिसत होतं, शेतं, ओढा, मंदिरे, लाल कौलांची घरं…
वाऱ्याच्या एका जोरदार झुळुकेत मनाला स्पष्ट जाणवलं “जीवन किती धावतंय, आणि आपण किती विसरत चाललोय…”
त्या उंचीवर काही क्षण स्वतःशीच बसून राहणं म्हणजे एक प्रकारची साधना होती.

      रात्री अंगणात खाट टाकून मी झोपायला गेलो.
आकाश भरलं होतं ताऱ्यांनी.
वाऱ्याचा मंद आवाज, आसपासचा अंधार, आणि त्या शांततेत येणाऱ्या मातीच्या गंधाने मनात एकच विचार पक्का झाला.
“या मातीशी नातं तुटत नाही… काहीही झालं तरी नाही.”

       त्या रात्री झोपताना मला जाणवलं, गावाकडा जाणं म्हणजे बाहेरचा प्रवास नव्हे, तो आतल्या प्रवासाचा आरंभ असतो.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा

- विलास खैरनार 

इंदुरीकर महाराज लोकप्रिय झाले ते त्यांच्या नवीन पद्धतीच्या कीर्तनशैलीमुळे. त्यांच्या अगोदरही अनेक कीर्तनकार झाले, पण अशा विनोदी भरलेल्या, जोरदार अभिनयाने सजलेल्या, कधी-कधी टोकाच्या टीकेने रंगलेल्या शैलीत कोणी बोलले नव्हते. ‘कॉमेडी कीर्तन’ हा शब्द कानावर पडायला लागला तो यांच्यामुळेच.पण त्यांच्या उपरोधिक टिप्पणींच्या धडाक्यात स्त्रियांविषयी अनेकदा कमीपणाची, हीन मानसिकतेची टीका ऐकू येत गेली, हेही तितकेच खरं. व्यसनाधीन युवकांवर त्यांनी झडर घातला, ते योग्यच; पण अनेक मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी मध्ययुगीनच वाटत असे. असो, विषय तो नाही. प्रश्न आहे त्यांच्या अलीकडील निर्णयाचा आणि त्यामागच्या दिलेल्या कारणाचा. अचानक ते म्हणाले "आता मी कीर्तन करणार नाही, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, कीर्तन करावं की करू नये. पण लोकांना मी घोडे लावलेत!" ही भाषा? आणि ही पद्धत कितपत योग्य?

वर्षानुवर्षे ते कीर्तनात सांगत आले, मुलींनी गॉगल लावू नये, मेकअप नको, वराती मध्ये नाच नको, खर्चिक लग्नं करू नयेत, गाडी-घोड्यांची मिरवणूक नको, मेनू साधा असावा, उधळपट्टी टाळा, लोक त्यावर टाळ्या पिटत, हसत, दाद देत.पण त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला मात्र, मोठा दिमाख, स्टाईलिश एंट्री, गॉगल, मेकअप, नाच, समारंभात भरपूर खर्च, आणि सगळे तेच "थेर" ज्यावर ते स्वतः वर्षानुवर्षे टीका करत आले. त्यांच्या मुलीला सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, हे साऱ्यांचंच मत आहे. पण तेच उपदेश करत राहणारे स्वतःला मात्र अपवाद समजून कसं चालणार?

ते सांगत होते की, वऱ्हाडी जमिनीवर बसले,वाढपी वारकरी पोशाखात, महिला पारंपरिक वेशात त्यांचे हे मुद्दे छानच आहेत पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले उपदेश त्यांनीच पाळले की नाही? त्यांनीच सांगितलं होतं “जेवण साधं असावं! एक लापशी, आमटी-भात पुरेसा!” पण त्यांच्या कार्यक्रमात? यादी पाहिली की त्यांचेच भाषण आठवतं. ज्यावर त्यांनी कडाडून टीका केली. 

लोकांवर उपदेश करणाऱ्यांचे आचरण अधिक कसोशीने तपासले जाते हेच इंदुरीकर महाराज विसरले. लोकांना चार गोष्टी सुनावणारा माणूस जेव्हा स्वतःच उलट वागतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. लोकांनी चूक दाखवली म्हणून त्यांच्यावर तेच नाराजी, त्रागा आणि "घोडे लावलेत!" अस बोलतात. ही भाषा आणि हा पवित्रा कीर्तनकारांना शोभणारा नाही. उपदेश करणारा स्वतः पाळत नसला तर त्याचा उपदेश तोंडाची वाफ ठरतो आणि हेच आज दिसलं. उपदेश एक आणि वर्तन दुसरे असेल तर तो दांभिकपणा ठरतो. संत परंपरेच्या नावाने बोलणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला नको का?

कीर्तन ही परंपरा म्हणजे फक्त विनोद, टिंगल, टाळ्या नव्हे, ती संस्कृती, प्रबोधन, विचार आणि नैतिकतेची साधना आहे.
“कीर्तन तेथेच, जिथे हिताचा संदेश असतो
आणि जिथे कीर्तन करावं तेथे अन्नाचा मोह नसावा" 
असे तुकाराम महाराज म्हणतात. ही मापदंडे आजचे सर्व कीर्तनकार पाळतात का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

इंदुरीकर महाराज जे काही होते आणि आजच्या परिस्थितीत तफावत दिसते म्हणूनच लोकांनी त्यांना आरसा दाखवला. हे स्वीकारणं कठीण जरी वाटलं तरी तेच योग्य आहे. प्रसिद्ध व्यक्ती कितीही मोठी असली तरी उपदेश करताना आणि आचरणात तफावत असेल तर समाज माफ करत नाही.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

साथ किसका?

हमें पत्थर मारने वालों में
वो भी साथ थे…!
जिनके गुनाह कभी हम
अपने सर लिया करते थे…!

कितनी अजीब होती है ये दुनिया,
चेहरे हँसते रहे पर दिलों में नक़्शे बदलते रहे।
हम समझते रहे जिन्हें अपना साया,
वो ही तिरछी धूप बनकर निकलते रहे।

हमने जिनके दर्द को अपनी चुपी में छुपाया,
वो ही आज हमारी आवाज़ का मज़ाक उड़ाते रहे।
जिनके लिये हम रातों को जागे,
वो ही सुबह हमें पत्थर दिखाते रहे।

लेकिन ज़िन्दगी का हिसाब बड़ा साफ़ होता है
कौन अपना, कौन पराया…
आख़िर वक्त ही बता देता है।

हम गिर भी जाएँ तो क्या?
हमारी रूह नहीं टूटने वाली
क्योंकि धोखा देने वाले बहुत मिले,
पर दिल से चाहने वाले
अब भी थोड़े सही, लेकीन सच्चे मिले.
                      - विलास खैरनार 

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

तुझ्या लग्नाच्या दिवशी



तुझ्या लग्नाच्या दिवशी,
मी गावातच होतो
तु फुलांनी नटलेली होतीस,
अन् मी आठवणींत अडकलो होतो.

नाही आलो मी तुझ्या लग्नाच्या मंडपात,
पण मन मात्र तुझ्याच भवती फिरत होतं 
तुझ्या नजरें आड तुलाच बघतं होतं,

तुला हळद लागली तेव्हा  
तु सोन्यासारखी चमकत होती
पण त्या पिवळ्या रंगाखाली
दडलेली तुझी वेदना फक्त मलाच दिसत होती

नगाऱ्यांच्या आवाजात
माझं मन शांत झालं होतं 
सनईच्या सुरात
नाव माझं कुठे दिसतं नव्हतं.

हसत होते सर्व 
अन् तु शांतपणे रडत होती
डोळ्यांत येणारं पाणी 
तु हळुवार पुसत होती

सात फेरे घेताना, तुझा तोल गेला 
लोक म्हणाले " तु जरा घाबरलीस",
पण मला जाणवलं,
तू तेव्हा माझ्या आठवणीत अडकलीस

तेव्हाच....
तुझ्या पायातील पैजणांचा एक घुंगरू,
घसरत माझ्या पायांजवळ आला,
वाकून मी तो उचलला,
तेव्हा त्यावर दिसत होती
तुझ्या मेहंदीची हलकी छटा,
अन् सुगंध तुझ्या अंगाचा,
तुझ्या ओंजळीचा...

पण लगेच आठवलं,
तो तुझ्या नव्या आयुष्याचा होता...

मी तो शांतपणे मुठीत बंद केला 
अन् मागे सरकलो,
त्या नव्या वाटेवर
माझ्या प्रेमाला अर्पण करत होतो

आता मी जेव्हा जेव्हा गावात जातो,
अन् त्याच ठिकाणी उभा राहतो,
तुझ्या लग्नाचा तो दिवस
दरवर्षी पुन्हा पुन्हा आठवतो 
             - विलास खैरनार 

स्मशानभूमी

 

रात्रीचा गडद अंधार उतरला
आकाशातला चंद्रही थकला
एक थंड वाऱ्याची झुळूक आली
आणि माझा पाऊल स्मशानभूमीत पडला

जवळच एका कावळ्याने काव केला 
जणू तु मला सांगत होता 
"इथं सगळ्यांनी येऊन गप्प व्हायचं असतं,
आवाजही इथे अर्थ हरवतो..."

एका चितेचा धूर आकाशाला भिडला
त्यात कुणाचं आयुष्य धुरासारखं विरलं होतं 
जणू कुणाचं स्वप्नं जळत होतं
कुणाचं हास्य, कुणाचं बालपण
एकेक लाकडं जळताना मी बघत होतो

त्या राखेतून उठणाऱ्या वाऱ्याने
माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला
अन् मला जाणवलं 
मृत्यूही किती शांत असतो
जीवनाच्या कोलाहलापेक्षा अधिक जिवंत असतो

स्मशानभूमी 
ही फक्त शेवटाची जागा नाही
ही सुरुवातीची जाणीव आहे
माणसाची शेवटी फक्त मातीच आहे

जिथे श्रीमंत-गरीब एकाच जागेवर येतात
जिथे अहंकार, पैसा, कीर्ती 
सगळं एकाच राखेत मिसळतात

त्या राखेखाली कित्येक कथा आहेत
कुणाचं अपूर्ण प्रेम
कुणाचं मोडलेलं आयुष्य
कुणाचं न सांगितलेलं सत्य

कधी कधी एखादा वाऱा वाहतो
तो जणू त्यांचाच श्वास असतो
जे अजून काही सांगू इच्छितात 
पण त्यांची भाषा आता राख झाली आहे

मी त्या रात्री बऱ्याच वेळ बसलो
त्या शांततेत
त्या राखेच्या सुगंधात
त्या मृत्यूसारख्या जिवंत क्षणात

आणि मला जाणवलं 
स्मशानभूमी भयाण नाही
ते सत्य आहे…
जीवंत माणसांसाठी 
ठेवलेला तो एक आरसा आहे

जिथे प्रत्येकाला दिसतं 
की आयुष्य किती क्षणभंगुर आहे
अन् प्रेमच एकमेव शाश्वत आहे

त्या राखेतून उठणाऱ्या धुरासारखं
मीही एक दिवस विरून जाणार
पण कदाचित कुणाच्या आठवणीत
थोडा जिवंत राहीन
जसं स्मशानभूमीत
धुरानंतरही उरतो तो वास 
शांततेचा, शेवटाचा, आणि सुरुवातीचा
                        - विलास खैरनार 


सोमवार, ३० जून, २०२५

गावाकडची माणसं


              - विलास खैरनार 


            गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडूपांचा तुकडा नव्हे… गाव म्हणजे जिवंत श्वास घेणारं एक असं नातं, ज्यात माणसं एकमेकांना न दिसणाऱ्या धाग्यांनी जोडलेली असतात. गाव म्हणजे स्मरणात विरघळणारा धूर, सकाळच्या ओल्या वाऱ्यात येणारा मातीचा सुगंध, आणि समाधान देणारा मानवी स्पर्श.

         गावाकडची माणसं हीच गावाची खरी ओळख. त्यांच्या जगण्यातला साधेपणा म्हणजे अलंकार, आणि त्यांच्या स्वभावातील गोडवा म्हणजे घराघरात जपलेली परंपरा. इथं कुणाचं दुःख एकट्याचं राहत नाही, आणि कुणाचा आनंदही फक्त त्यांचा राहत नाही. एखादा आजारी पडला की शेजारी आपसूक धावत येतात, कोणी काढा घेऊन, कोणी डॉक्टरकडे सोबत म्हणून, तर कोणी फक्त खांद्यावर हात ठेवून.

          गावात "आपलं" आणि "तुमचं" असं वेगळं काहीच नसतं. गावकरी एकमेकांत मिसळून गेलेले असतात. दिवाळी आली, लग्न आलं, शेतात काम वाढलं तर मदतीसाठी एकच हाक पुरेशी. "अरे येतो!" असं म्हणत अर्धं गाव हजर होतं. कोणाचं शेत कोणाचं घर हे जगणं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं.

इथली बोली साधी, थेट आणि मनाला भिडणारी असते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उन्हात काम करून आलेला काळसरपणा असतो, पण डोळ्यांत मात्र पाण्यासारखी पारदर्शक माणुसकी चमकत असते. शब्दांत गोडवा नसला तरी कृतीत प्रामाणिकपणा असतो. शहरात जिथे “काय काम?” म्हणून विचारावं लागतं, तिथं गावात कुणाचं काम विचारायची गरजच नसते, सगळ्यांना आपोआप कळतं.

गावातली म्हातारी मंडळी म्हणजे अनुभवांची जत्रा. त्यांच्या गोष्टींच्या झोळीत इतिहास, परंपरा आणि जीवनाचं शहाणपण असतं. मंदिराच्या ओट्यावर, वडाच्या झाडाखाली किंवा दिवसा उन्हातून सुटकेसाठी ओटीवर बसून सांगितलेल्या जुन्या आठवणी त्यात एक वेगळीच ऊब असते. त्या कथांनी पिढ्या घडतात. आणि गावातली पोरं? त्यांच्या जगण्यात स्क्रीनपेक्षा जास्त रंग असतात. पावसात चिखलात लोळण घेणं, काठ्या-कुटक्या घेऊन खेळणं, झाडावर चढून कावळ्याची अंडी शोधण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणात एक वेगळी उर्मी असते. मोकळं आभाळ, हिरवं रान आणि धावणारा वारा हेच त्यांचे खेळाचे साथी.

           गावातील बायका म्हणजे घर, रान आणि जगण्याचा आधारस्तंभ. सकाळचा चुलीवरच्या चहा  पासून ते संध्याकाळच्या जनावरांच्या देखभालीपर्यंत त्यांचं काम अविरत चालत राहतं. अंगण झाडणं, रानात पेरणी करणे, घरात लोणची घालणं कामाला शेवट नसतो. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर एका विचित्र समाधानाची हसू असतं, जणू जगण्याला त्यांनी मिठी मारली आहे.

गावातले सण, गावातल्या परंपरा शहरातील कृत्रिम प्रकाशात दिसत नाही अशी साधी-सरळ चमक यात असते. पोळ्यांच्या वेळी पोळ्या काढणं, शेतात गोंधळ, बैलजोडीला लावलेली तुरेवारी, भोंडल्यातील गाणी गावाचं आयुष्य ऋतुंसारखं तालबद्ध चालत राहतं.

      शहराच्या झगमगाटात आज जिथे माणुसकी हरवत चालली आहे, तिथं गाव अजूनही माणुसकीचा दिवा पेटवून बसलेलं असतं. इथल्या माणसांच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या मनात मोकळेपणा आहे.
      गावाकडची माणसं म्हणजे खरी भारताची शान, साधी, सरळ, सच्ची आणि जिवाला भिडणारी. त्यांच्या जगण्यातली ओल, त्यांच्या नात्यांमधला उबदारपणा आणि त्यांच्या साधेपणातला सौंदर्य हेच खरं भारताचा आत्मा आहे.


बुधवार, १९ मार्च, २०२५

नागपूरात झालेल्या दंगलीचे जबाबदार कोण ?

  - विलास खैरनार

नागपूरमध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा खेळ सुरू झालाय! आणि हा खेळ खेळणारे काही ठराविक लोकच आहेत - जेवढं रक्त सांडेल, तितकं त्यांच्या राजकीय स्वार्थाला खतपाणी मिळतं. औरंगजेबच्या नावाने आंदोलन करून बाबा ताजुद्दीन यांच्या चादरीचा अपमान करणारे हे कोण? आणि का? ह्यांचा उद्देश काय? धार्मिक भावना दुखावून, समाजात विष पसरवणं हाच काय "संस्कृती रक्षणाचा" मार्ग उरलाय का?


ही नागपूरची संस्कृती आहे का? महाल भाग म्हणजे नागपूरचं हृदय, आणि त्यात हे द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय! आज हे सुरू झालंय, उद्या तिथं आणखी काही पेटवलं जाईल. हे लोक कोणत्याही एका धर्माचे हितचिंतक नाहीत - ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी, लोकांच्या भावना विकण्याचं काम करतायत. नागपूरकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ही आग आपल्या दारात लावली जातेय, आणि तिच्या ज्वाळा वाढतील तेव्हा हे सगळे "संस्कृती रक्षक" लांब पळतील! त्यांना ना इथल्या हिंदूंचा खरा फायदा करायचा आहे, ना मुसलमानांचा -त्यांना फक्त सत्ता हवी आहे! आता नागपूरचं सामाजिक शांतता वाचवायची की हे सगळं शांत पाहायचं, हा निर्णय नागपूरकरांनी घ्यावा!

चोरांचे सरकार आहे ... दंगलखोरांचे सरकार आहे
आमदार चोरले
जनमत चोरले
पक्ष चोरले
न्याय चोरला
भ्रष्टाचाराच्या फायली दाखवत , तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन, विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करुन आपल्यासोबत घ्यायचे आणि सत्तेत बसून सरकारी तिजोरी व मालमत्ता लुटायची हा खेळ दिवसाढवळ्या सुरु आहे .
जोपर्यंत बहुसंख्य निगरगट्ट आणि बावळट जनता सुधारणार नाही , कणखर विरोध दर्शविणार नाही तोपर्यंत हे असेच बघावे लागणार यात तिळमात्रही शंका नाही .

समाजात निर्माण होणाऱ्या दंगली, जातीय तेढ आणि हिंसाचार हे सहसा नियोजित आणि हेतुपूर्वक घडवले जातात. यामागे काही विशिष्ट गट, जात किंवा धर्म आपल्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. मराठा समाजाने अशा प्रकारच्या कटकारस्थानांना बळी न पडता, संयम आणि शहाणपणाने विचार करून पावले उचलली पाहिजेत.

मराठा समाज हा स्वाभिमानी असून, ऐतिहासिकदृष्ट्या समाजहितासाठी नेहमीच पुढे राहिला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांनी अशा हिंसाचारात न पडता, आपली ताकद संघटनेत आणि कायदेशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढण्यात खर्च केली पाहिजे.

या मुद्द्यावर काही ठळक बाबी:
1. दंगली हेतुपूर्वक घडविल्या जातात – काही विशिष्ट गट समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशा घटना घडवतात.

2. मराठ्यांनी यामध्ये न पडणे हेच हिताचे – दंगलीत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

3. संघटित आणि शांततामय लढा अधिक प्रभावी – कायद्याच्या मार्गाने आणि राजकीय सामर्थ्याने प्रश्न सोडवता येतो.

4. आरक्षणविरोधी गट स्वतः सक्षम आहेत – त्यांना मराठ्यांकडून सहानुभूतीची गरज नाही.

अशा परिस्थितीत मराठा समाजाने आपले मुख्य उद्दिष्ट – आरक्षण आणि सामाजिक प्रगती – याकडे लक्ष केंद्रित करावे. समाजविघातक तत्वांपासून सावध राहून, आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने लढणे हेच शहाणपणाचे ठरेल.

मातृभूमीच्या संरक्षणासाठी ज्यांनी पिढ्यान पिढ्या घातल्या त्यांना धर्माचे संवर्धन, संरक्षण करण्याची चांगली समज आहे.

"३१८ वर्षांपूर्वी मेलेल्या औरंगजेबावर राजकारण करणार्‍यांसाठी काही विचार"

औरंगजेब १७०७ साली मेला. या गोष्टीला ३१८ वर्ष झाले पुढे त्याच्या मृत्यूनंतर भारत बदलला, पुढे अनेक साम्राज्ये आली आणि गेली, शेवटी देश स्वतंत्र झाला. पण २०२५ मध्येही जर काही लोक औरंगजेबाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करत असतील, तर त्यांनी स्वतःच्या राजकीय अपयशावर विचार केला पाहिजे.

विकासाचा मुद्दा टाळण्यासाठी इतिहासाची धूळ उकरून काढणाऱ्या नेत्यांना काही प्रश्न:

महागाईवर उपाययोजना आहेत का?
तरुणांना नोकऱ्या देण्याची योजना आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का?
रस्ते, पाणी, वीज यावर लक्ष दिलं का?
देशाला औरंगजेबाच्या भुताची नाही, तर उत्तम आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेची गरज आहे!
राजकारण विकासावर करा, इतिहासावर नव्हे!

सर्व धर्मीयांनी एकत्र या आणि षडयंत्र मोडून काढा .
मनुवाद्या॑चे कुटील कारस्थान संपवा आणि शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवा .

रविवार, १ डिसेंबर, २०२४

मतदान


सर्वत्र शुकशुकाट होता
कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता

विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता

गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार

EVM घोटाळा


चारा,स्टॅम्प, 2G,
सिंचन,आदर्श
सर्व घोटाळे बघितले

आज पहिल्यांदा देव इंद्राचा
EVM घोटाळा बघितला
अन् मीच माझ्या डोक्याला हात लावला
अरे हा तर
सर्वच घोटाळे बाजांचा बाप निघाला
सर्व मंत्री मंडळच याने काबिज केला

थोडी तरी लाज वाटू दिली असती
किमान विधानसभेत बोलतांना
तुमची मान खाली गेली नसती

अरे घोटाळ्यांची
कशी ठेवणार तुम्ही मापं
अन्
कुठं फेडणार एवढी पापं

शेतकऱ्या तु तर
खुले आम कापला गेला
EVM च्या कोयत्यावर
कारण आता
विधानसभेत कोणीच
नाही तुझ्या बऱ्यावर
अरे
विरोधकच गेलाय
आता वाऱ्यावर

आज शहीद, हुतात्मे
सर्व रडले असतील
भारत माते समोर
खून केला तुम्ही
लोकशाहीचा
संविधाना समोर
- विलास खैरनार

प्रचार


तुमच्या प्रचारासाठी आलेल्या गाड्या
फक्त माझ्या गावाच्या बस स्टॅण्ड पर्यंतच येतील
पुढे तुम्हाला सार्वजनिक मुतारीच्या बाजूने
गटारीतून उडी घेत
शिवाजी चौकापर्यंत जावं लागेल,

नंतर तुम्हाला तुटलेल्या कवलांची
अन् पडलेल्या भिंतींची
जिल्हा परिषदेची शाळा दिसेल
शाळेतील फाटक्या कपड्यातील
कळकटलेले पोरं तुमच्याकडे पाहतील
त्या पोरांकडे बघून तुम्हाला किळसवाण वाटेल
पण तिथूनच तुम्हाला उकीरड्यातून नाक धरून
पुढे वस्तीत जावं लागेल

तिथे गेल्यावर आठ दहा पोरांचा घोळका
बसलेलला दिसेल
कोणाच्या हातात पत्ते,
कोणाच्या हातात बिडी तर दारूचा ग्लास ही असेल
तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका
ते तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल
अन् दुष्काळात तुम्ही आमच्यासाठी काय केलं?
कोणी काहीच विचारणार नाही
त्यांना तुम्ही तुमच्या जवळ असलेले
वांझोटे स्वप्ने दाखवा

त्याच वाट चुकलेल्या पोरांना
तुम्ही तुमची पुढची वाट विचारा
नाहीतर...
समोरच्या भिंतीवर "रोजगार हमी योजना"
अन् "मनरेगा" अस लिहिलेलं दिसेल
तिथूनच मोठ मोठे खड्डे असलेला रस्ता
तुम्हाला दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाईल.
तुमच्या प्रचारासाठी...
- विलास खैरनार

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

भांडण

भांडण

आज जोराचे भांडण झाले
तिचं आणि माझं

प्रश्न अन् उत्तरांनी
तुफान राडा केला
वर्ष भराच्या रागाचा
वर्षाव तिथे झाला

शब्दाला शब्द भिणला
भावनांचा कल्लोळ झाला

भांडण फक्त तिच्यात
अन् माझं
तिसरं तिथे
कोणीच नव्हतं

भांडण मिटता मिटत नव्हतं
कारण फक्त भेटीच होतं

भांडण टोका पर्यंत आले
दूर होण्याचे विचार झाले
शेवटचे सर्व निर्णय
तिने माझ्यावर सोडले

मग मी ही स्वतः ला शांत केलं
थोडं भूतकाळात डोकवलं
अन् तिच्याकडे बघितलं

तिला जवळ घेतलं
तिचे अश्रू पुसत
तिला मिठीत घेतलं
अन्
दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटलं

दोन तासापासून
सुरू असलेलं भांडण
एका सेंकदात मिटलं
- विलास खैरनार

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

बस स्थानकावरचा तो एक दिवस

  - विलास खैरनार

कॉलेज मधून धावपळ करत मी बस स्थानकावर पोहोचलो तर कळलं की गाडी एक तास उशिरा येणार आहे म्हणजे दुपारच्या एक वाजता. बस चुकली नाही एवढंच समाधान मनात होतं पण तिथे नजर कोणाला तरी सारखी शोधत होती. माझी नजर पूर्ण बस स्थानकावर फिरत होती. जागोजागी प्रवाशी उभे होते, कोणाच्या हातात बाजारांच्या पिशव्या तर बायांच्या डोक्यावर बोचके होते, समोरच साधारण साठीच्या पुढच्या नऊवारीतल्या दोन म्हाताऱ्या आजी आपसात गप्पा करत होत्या.
"काय शे तिना माहेरमा, तेसले खावन पडी जाईल शे आणि आटे तोरा अशी दखाडस एखादी राजानी पोर शे, तो ते नुसता बैल करी टाका तिनी," पहिली आजी तोंड वाकड करत म्हणाली
"आमनीनं तर नको विचारू, जशी काही सासरमा जे शे सगळं तिना बापनीच धाडेल शे, काय शे व माय आमनीन माहेर मा, निधी ना भंडारा, नी गावभर डोम्बारा" दुसरी आजी पदर सावरत म्हणाली



मी आजींच्या गप्पा व्यवस्थित ऐकू लागलो, त्या आपापल्या सुनाचे बद्दल बोलत होत्या, गप्पा ऐकून मनातल्या मनात हसू लागलो काही वेळात एका म्हाताऱ्या आजीचे लक्ष माझ्याकडे गेले अन तिने मला निरखून बघितले आणि लगेच गप्पा थांबून मला वेळ विचारला, मी हळूच सांगितले "सव्वा बारा वाजले आजी", पण दुसरी आजी माझ्याकडे डोळे वटारुन बघत होती, मी त्यांचे बोलन चोरून ऐकत होतो असं त्या आजीच्या लक्षात आले असावे म्हणून मी तिथून काढता पाय घेतला,
मी परत पूर्ण बस स्थानकावर नजर फिरवली ती मला कुठेच दिसली नाही, बस स्थानकाच्या अलीकडेच सरोदे न्युज एजेंशी जवळ दोन म्हातारे बाबा एकच न्युज पेपर एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकून वाचत होते अन त्यांच्या अगदी जवळच मुला-मुलींचा घोळका गप्पा करत स्वत:चे मनोरंजन करीत होते, न्युज एजेंशी जवळच भल्या मोठ्या निंबाच्या झाडाला पाट टेकून उभा राहिलो, माझा संयम आता सुटत चालला होता, मनात बैचेनी वाढत होती, मी माझे कान त्या मुलांकडे लावले, पण त्यांच्या गप्पा न सांगितलेल्या बऱ्या मी माझे कान बंद केले बाबांच्या पेपर मध्ये डोकवत पेपर वाचण्याचा प्रयत्न करू लागलो, तिथे पण न्युज पेपरमध्ये हेड लाईन दिसत नव्हत्या, मी व्यवस्थित निरखून पाहिले पण पेपरामध्ये फक्त कल्याण, मिलन तिथे सर्व आकडे आकडे दिसले, "अरे यार हे तर रतन खत्रीचे माणसं आहेत, ते बाबा जुगार खेळणारे दिसले, मी मनातल्या मनात म्हटले इथे सगळ 'ईय्या मोडीनं खिय्या करनं' काम चालू शे", तिथून हि मी काढता पाय घेतला आणि रस्त्याकडे नजर टाकली, बघतो तर काय ती अन तिच्या मैत्रिणी सोबत समोरून येत होत्या, दोघेही जोरजोरात हसत बस स्थानका मध्ये येत होत्या, मी जणू काही वाऱ्यासारखा उडू लागलो, पक्षासारखा डोलू लागलो, मन आनंदाने बहरून आले,