मंगळवार, ९ जून, २०२६
जनगणना : एक अस्मरणीय अनुभव
बुधवार, १८ मार्च, २०२६
भक्तीचा डंका
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
यमुना
सोमवार, ५ जानेवारी, २०२६
आजचा मिडिया
रविवार, २१ डिसेंबर, २०२५
बस स्टँडवर उभा असलेला काळ
- विलास खैरनार
मी आज साक्री बस स्टँडवर शांत उभा होतो. डोळे रस्त्याकडे लागलेले, कानात वाहनांचा आवाज, हातात मोबाईल, आणि मनात एकच विचार,बस केव्हा येईल? घड्याळाकडे वारंवार पाहण्याची सवय लागली आहे. वेळेच्या काट्यावर आयुष्य मोजणारी ही आजची धावपळ, कुठे थांबू देत नाही. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं झालं आहे. उशीर म्हणजे नुकसान, थांबणं म्हणजे वेळेची नासाडी, असं आजचं गणित झालं आहे. पण याच बस स्टँडवर उभा राहून, आज अचानक एक वेगळाच काळ आठवला.
तो एक काळ होता…
जेव्हा बस येण्याची घाईच नसायची. तेव्हा आम्ही तासंतास बसची वाट पाहायचो. बस उशिरा आली, रद्द झाली, दुसरी पकडावी लागली, काहीही झालं तरी ताण नव्हता, चिडचिड नव्हती. कारण तेव्हा वेळ आमच्यासोबत चालायचा. आज मात्र आपण वेळेमागे धावत आहोत, आणि तरीही तो गाठता येत नाही. कॉलेज सुटलं की थेट बस स्टँड. ते फक्त थांबायचं ठिकाण नव्हतं, ते आमचं दुसरं जग होतं. हातात दोन पुस्तकं, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत उत्सुकता. कोण येईल, कोण नाही, आज कोणती चर्चा रंगेल याची आतुरता असायची. मित्र, मैत्रिणी, ओळखीचे चेहरे, कधी कधी एखादी अनोळखी पण हळूहळू आपली होणारी व्यक्ती. चहाच्या टपरीवरचा तो उकळता चहा, भेळीचा कागदी कोन, वडापावचा वास, आणि त्यासोबत न संपणाऱ्या गप्पा. कोणी भविष्याची स्वप्नं रंगवायचं,“आपण मोठं काहीतरी करूया,”कोणी सरकारी नोकरीची स्वप्नं पाहायचं, कोणी गाव सोडून जायचं स्वप्न पाहायचं, तर कोणी कुठेच न जाण्याचं. कोणी एखाद्या प्रेमकथेचा हळूच उल्लेख करायचं, नाव न घेता, पण सगळ्यांना कळेल अशा शब्दांत. कोणी शिक्षकांवर टीका करायचं,कोणी कॉलेजच्या व्यवस्थेवर, तर कोणी थेट संपूर्ण समाजावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं.त्या गप्पांमध्ये ना मोबाईल होता, ना नोटिफिकेशनचा आवाज, ना कॉल कट झाल्याची घाई. फक्त हसणं होतं, ऐकणं होतं, आणि मनसोक्त जगणं होतं.
तेव्हा बस स्टँड म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नव्हतं. ते एक थांबलेलं आयुष्य होतं, जिथे वेळ थांबायचा, क्षण अनुभवले जायचे, आणि माणसं माणसांसोबत असायची. आज तोच बस स्टँड आहे. तोच रस्ता, तोच फलक, तीच चहाची टपरी. पण चेहरे बदललेत. आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. हेडफोन कानात, डोळे स्क्रीनवर, आणि मन कुठे तरी दूर. नात्यांची जागा हेडफोननी घेतली आहे, गप्पांची जागा स्क्रीनने, आणि भेटींची जागा “स्टेटस” आणि “रील्स”नी.
आज बस उशिरा झाली तर चिडचिड होते. तक्रार करावीशी वाटते.कोणाला तरी दोष द्यावासा वाटतो. कारण आज वेळ कमी आहे. आणि आठवणींसाठी वेळच उरलेला नाही. बस येते, मी चढतो, प्रवास सुरू होतो. पण मन मात्र मागेच राहून जातं, त्या काळात, त्या मित्रांमध्ये, त्या निष्काळजी, निर्मळ दिवसांमध्ये.
खरंच, तेव्हा बसची वाट पाहणं कंटाळवाणं नव्हतं.तो एक अनुभव होता. एक जगणं होतं. एक शिकवण होती, की आयुष्य म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर थांबणंही आहे. आज बस येण्याची वाट पाहतो, पण त्या काळाची बस कधीच येणार नाही… हे उमगूनही मन मात्र दरवेळी त्या जुन्या बस स्टँडवर थोडा वेळ थांबतंच. कारण काही जागा, काही क्षण, आणि काही माणसं, काळाच्या पुढे जात नाहीत, ती मनातच थांबलेली असतात, कायमची.
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
कर्णाचा प्रश्न
जीवाभावाचा मित्र
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
ज्ञानोबा
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५
भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
कर्ण
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
गावाकडचा प्रवास
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा
बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५
साथ किसका?
रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५
तुझ्या लग्नाच्या दिवशी
स्मशानभूमी
सोमवार, ३० जून, २०२५
गावाकडची माणसं
- विलास खैरनार
गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडूपांचा तुकडा नव्हे… गाव म्हणजे जिवंत श्वास घेणारं एक असं नातं, ज्यात माणसं एकमेकांना न दिसणाऱ्या धाग्यांनी जोडलेली असतात. गाव म्हणजे स्मरणात विरघळणारा धूर, सकाळच्या ओल्या वाऱ्यात येणारा मातीचा सुगंध, आणि समाधान देणारा मानवी स्पर्श.
गावाकडची माणसं हीच गावाची खरी ओळख. त्यांच्या जगण्यातला साधेपणा म्हणजे अलंकार, आणि त्यांच्या स्वभावातील गोडवा म्हणजे घराघरात जपलेली परंपरा. इथं कुणाचं दुःख एकट्याचं राहत नाही, आणि कुणाचा आनंदही फक्त त्यांचा राहत नाही. एखादा आजारी पडला की शेजारी आपसूक धावत येतात, कोणी काढा घेऊन, कोणी डॉक्टरकडे सोबत म्हणून, तर कोणी फक्त खांद्यावर हात ठेवून.
गावात "आपलं" आणि "तुमचं" असं वेगळं काहीच नसतं. गावकरी एकमेकांत मिसळून गेलेले असतात. दिवाळी आली, लग्न आलं, शेतात काम वाढलं तर मदतीसाठी एकच हाक पुरेशी. "अरे येतो!" असं म्हणत अर्धं गाव हजर होतं. कोणाचं शेत कोणाचं घर हे जगणं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं.
इथली बोली साधी, थेट आणि मनाला भिडणारी असते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उन्हात काम करून आलेला काळसरपणा असतो, पण डोळ्यांत मात्र पाण्यासारखी पारदर्शक माणुसकी चमकत असते. शब्दांत गोडवा नसला तरी कृतीत प्रामाणिकपणा असतो. शहरात जिथे “काय काम?” म्हणून विचारावं लागतं, तिथं गावात कुणाचं काम विचारायची गरजच नसते, सगळ्यांना आपोआप कळतं.
गावातली म्हातारी मंडळी म्हणजे अनुभवांची जत्रा. त्यांच्या गोष्टींच्या झोळीत इतिहास, परंपरा आणि जीवनाचं शहाणपण असतं. मंदिराच्या ओट्यावर, वडाच्या झाडाखाली किंवा दिवसा उन्हातून सुटकेसाठी ओटीवर बसून सांगितलेल्या जुन्या आठवणी त्यात एक वेगळीच ऊब असते. त्या कथांनी पिढ्या घडतात. आणि गावातली पोरं? त्यांच्या जगण्यात स्क्रीनपेक्षा जास्त रंग असतात. पावसात चिखलात लोळण घेणं, काठ्या-कुटक्या घेऊन खेळणं, झाडावर चढून कावळ्याची अंडी शोधण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणात एक वेगळी उर्मी असते. मोकळं आभाळ, हिरवं रान आणि धावणारा वारा हेच त्यांचे खेळाचे साथी.
गावातील बायका म्हणजे घर, रान आणि जगण्याचा आधारस्तंभ. सकाळचा चुलीवरच्या चहा पासून ते संध्याकाळच्या जनावरांच्या देखभालीपर्यंत त्यांचं काम अविरत चालत राहतं. अंगण झाडणं, रानात पेरणी करणे, घरात लोणची घालणं कामाला शेवट नसतो. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर एका विचित्र समाधानाची हसू असतं, जणू जगण्याला त्यांनी मिठी मारली आहे.
गावातले सण, गावातल्या परंपरा शहरातील कृत्रिम प्रकाशात दिसत नाही अशी साधी-सरळ चमक यात असते. पोळ्यांच्या वेळी पोळ्या काढणं, शेतात गोंधळ, बैलजोडीला लावलेली तुरेवारी, भोंडल्यातील गाणी गावाचं आयुष्य ऋतुंसारखं तालबद्ध चालत राहतं.
शहराच्या झगमगाटात आज जिथे माणुसकी हरवत चालली आहे, तिथं गाव अजूनही माणुसकीचा दिवा पेटवून बसलेलं असतं. इथल्या माणसांच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या मनात मोकळेपणा आहे.
गावाकडची माणसं म्हणजे खरी भारताची शान, साधी, सरळ, सच्ची आणि जिवाला भिडणारी. त्यांच्या जगण्यातली ओल, त्यांच्या नात्यांमधला उबदारपणा आणि त्यांच्या साधेपणातला सौंदर्य हेच खरं भारताचा आत्मा आहे.
बुधवार, १९ मार्च, २०२५
नागपूरात झालेल्या दंगलीचे जबाबदार कोण ?
- विलास खैरनार
नागपूरमध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा खेळ सुरू झालाय! आणि हा खेळ खेळणारे काही ठराविक लोकच आहेत - जेवढं रक्त सांडेल, तितकं त्यांच्या राजकीय स्वार्थाला खतपाणी मिळतं. औरंगजेबच्या नावाने आंदोलन करून बाबा ताजुद्दीन यांच्या चादरीचा अपमान करणारे हे कोण? आणि का? ह्यांचा उद्देश काय? धार्मिक भावना दुखावून, समाजात विष पसरवणं हाच काय "संस्कृती रक्षणाचा" मार्ग उरलाय का?
ही नागपूरची संस्कृती आहे का? महाल भाग म्हणजे नागपूरचं हृदय, आणि त्यात हे द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय! आज हे सुरू झालंय, उद्या तिथं आणखी काही पेटवलं जाईल. हे लोक कोणत्याही एका धर्माचे हितचिंतक नाहीत - ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी, लोकांच्या भावना विकण्याचं काम करतायत. नागपूरकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ही आग आपल्या दारात लावली जातेय, आणि तिच्या ज्वाळा वाढतील तेव्हा हे सगळे "संस्कृती रक्षक" लांब पळतील! त्यांना ना इथल्या हिंदूंचा खरा फायदा करायचा आहे, ना मुसलमानांचा -त्यांना फक्त सत्ता हवी आहे! आता नागपूरचं सामाजिक शांतता वाचवायची की हे सगळं शांत पाहायचं, हा निर्णय नागपूरकरांनी घ्यावा!
आमदार चोरले
जनमत चोरले
पक्ष चोरले
न्याय चोरला
भ्रष्टाचाराच्या फायली दाखवत , तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन, विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करुन आपल्यासोबत घ्यायचे आणि सत्तेत बसून सरकारी तिजोरी व मालमत्ता लुटायची हा खेळ दिवसाढवळ्या सुरु आहे .
जोपर्यंत बहुसंख्य निगरगट्ट आणि बावळट जनता सुधारणार नाही , कणखर विरोध दर्शविणार नाही तोपर्यंत हे असेच बघावे लागणार यात तिळमात्रही शंका नाही .
समाजात निर्माण होणाऱ्या दंगली, जातीय तेढ आणि हिंसाचार हे सहसा नियोजित आणि हेतुपूर्वक घडवले जातात. यामागे काही विशिष्ट गट, जात किंवा धर्म आपल्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. मराठा समाजाने अशा प्रकारच्या कटकारस्थानांना बळी न पडता, संयम आणि शहाणपणाने विचार करून पावले उचलली पाहिजेत.
मराठा समाज हा स्वाभिमानी असून, ऐतिहासिकदृष्ट्या समाजहितासाठी नेहमीच पुढे राहिला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांनी अशा हिंसाचारात न पडता, आपली ताकद संघटनेत आणि कायदेशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढण्यात खर्च केली पाहिजे.
या मुद्द्यावर काही ठळक बाबी:
1. दंगली हेतुपूर्वक घडविल्या जातात – काही विशिष्ट गट समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशा घटना घडवतात.
2. मराठ्यांनी यामध्ये न पडणे हेच हिताचे – दंगलीत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
3. संघटित आणि शांततामय लढा अधिक प्रभावी – कायद्याच्या मार्गाने आणि राजकीय सामर्थ्याने प्रश्न सोडवता येतो.
4. आरक्षणविरोधी गट स्वतः सक्षम आहेत – त्यांना मराठ्यांकडून सहानुभूतीची गरज नाही.
अशा परिस्थितीत मराठा समाजाने आपले मुख्य उद्दिष्ट – आरक्षण आणि सामाजिक प्रगती – याकडे लक्ष केंद्रित करावे. समाजविघातक तत्वांपासून सावध राहून, आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने लढणे हेच शहाणपणाचे ठरेल.
मातृभूमीच्या संरक्षणासाठी ज्यांनी पिढ्यान पिढ्या घातल्या त्यांना धर्माचे संवर्धन, संरक्षण करण्याची चांगली समज आहे.
"३१८ वर्षांपूर्वी मेलेल्या औरंगजेबावर राजकारण करणार्यांसाठी काही विचार"
औरंगजेब १७०७ साली मेला. या गोष्टीला ३१८ वर्ष झाले पुढे त्याच्या मृत्यूनंतर भारत बदलला, पुढे अनेक साम्राज्ये आली आणि गेली, शेवटी देश स्वतंत्र झाला. पण २०२५ मध्येही जर काही लोक औरंगजेबाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करत असतील, तर त्यांनी स्वतःच्या राजकीय अपयशावर विचार केला पाहिजे.
विकासाचा मुद्दा टाळण्यासाठी इतिहासाची धूळ उकरून काढणाऱ्या नेत्यांना काही प्रश्न:
महागाईवर उपाययोजना आहेत का?
तरुणांना नोकऱ्या देण्याची योजना आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का?
रस्ते, पाणी, वीज यावर लक्ष दिलं का?
देशाला औरंगजेबाच्या भुताची नाही, तर उत्तम आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेची गरज आहे!
राजकारण विकासावर करा, इतिहासावर नव्हे!
सर्व धर्मीयांनी एकत्र या आणि षडयंत्र मोडून काढा .
मनुवाद्या॑चे कुटील कारस्थान संपवा आणि शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवा .
रविवार, १ डिसेंबर, २०२४
मतदान
कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता
विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता
गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार
EVM घोटाळा
सिंचन,आदर्श
सर्व घोटाळे बघितले
आज पहिल्यांदा देव इंद्राचा
EVM घोटाळा बघितला
अन् मीच माझ्या डोक्याला हात लावला
अरे हा तर
सर्वच घोटाळे बाजांचा बाप निघाला
सर्व मंत्री मंडळच याने काबिज केला
थोडी तरी लाज वाटू दिली असती
किमान विधानसभेत बोलतांना
तुमची मान खाली गेली नसती
अरे घोटाळ्यांची
कशी ठेवणार तुम्ही मापं
अन्
कुठं फेडणार एवढी पापं
शेतकऱ्या तु तर
खुले आम कापला गेला
EVM च्या कोयत्यावर
कारण आता
विधानसभेत कोणीच
नाही तुझ्या बऱ्यावर
अरे
विरोधकच गेलाय
आता वाऱ्यावर
आज शहीद, हुतात्मे
सर्व रडले असतील
भारत माते समोर
खून केला तुम्ही
लोकशाहीचा
संविधाना समोर
- विलास खैरनार
प्रचार
फक्त माझ्या गावाच्या बस स्टॅण्ड पर्यंतच येतील
पुढे तुम्हाला सार्वजनिक मुतारीच्या बाजूने
गटारीतून उडी घेत
शिवाजी चौकापर्यंत जावं लागेल,
नंतर तुम्हाला तुटलेल्या कवलांची
अन् पडलेल्या भिंतींची
जिल्हा परिषदेची शाळा दिसेल
शाळेतील फाटक्या कपड्यातील
कळकटलेले पोरं तुमच्याकडे पाहतील
त्या पोरांकडे बघून तुम्हाला किळसवाण वाटेल
पण तिथूनच तुम्हाला उकीरड्यातून नाक धरून
पुढे वस्तीत जावं लागेल
तिथे गेल्यावर आठ दहा पोरांचा घोळका
बसलेलला दिसेल
कोणाच्या हातात पत्ते,
कोणाच्या हातात बिडी तर दारूचा ग्लास ही असेल
तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका
ते तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल
अन् दुष्काळात तुम्ही आमच्यासाठी काय केलं?
कोणी काहीच विचारणार नाही
त्यांना तुम्ही तुमच्या जवळ असलेले
वांझोटे स्वप्ने दाखवा
त्याच वाट चुकलेल्या पोरांना
तुम्ही तुमची पुढची वाट विचारा
नाहीतर...
समोरच्या भिंतीवर "रोजगार हमी योजना"
अन् "मनरेगा" अस लिहिलेलं दिसेल
तिथूनच मोठ मोठे खड्डे असलेला रस्ता
तुम्हाला दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाईल.
तुमच्या प्रचारासाठी...
- विलास खैरनार
